- राज्य
- ''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'
''आधारकार्डमध्ये कार्डधारकाचा रक्तगट समाविष्ट करावा'
दीपक मानकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
पुणे: प्रतिनिधी
भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाच्या कागदपत्रांपैकी एक असलेल्या आधारकार्डमध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री. जगत प्रकाश नड्डा तसेच जागतिक आरोग्य संघटना आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालक सायमा वाजेद यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दीपक मानकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हणले आहे की, भारत सरकारने प्रत्येक भारतीय नागरिकाच्या ओळखीशी संबंधित सर्वात महत्वाचे कागदपत्रांपैकी एक म्हणजे आधारकार्ड हा ओळखीचा पुरावा दिलेला. आहे. आधारकार्ड हे एक असे कागदपत्र बँकिंग आणि दूरसंचार क्षेत्रात एक महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा बँक खाते क्रमांक आणि टेलिफोन नंबर त्यांच्या आधारक्रमांकाशी जोडला जातो. आधारकार्ड वर १२ अंकी अद्वितीय क्रमांक छापलेला आहे जो भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) जारी केला आहे. त्यामध्ये नागरिकांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर, फोटो आणि इतर आवश्यक माहिती असते. त्यामुळे भारतीय नागरिकांना त्यांची ओळख दाखवण्यास अत्यंत सुलभ झाले आहे.
आजच्या काळात प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड हे वापरले जाते आणि ते प्रत्येक भारतीयास आवश्यक मानले जात आहे. त्याचप्रमाणे व्यक्तीचा रक्तगट हा महत्त्वाचा असतो कारण तो वैद्यकीय उपचारांमध्ये, विशेषतः रक्त संक्रमणाच्या वेळी अत्यंत आवश्यक असतो. रक्तगट जुळल्यास, गंभीर आरोग्य समस्या टाळता येतात.रक्तगट महत्त्वाचे असल्याचे कारण अपघात, रक्त संक्रमण, गर्भावस्थेतील गुंतागुंत, अवयव प्रत्यारोपण,आजारांचा धोका या वेळी रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावतो. रक्त संक्रमणाच्या वेळी, रक्तगट जुळणे आवश्यक आहे. विसंगत रक्तगटाचे रक्त दिल्यास, रक्ताच्या गुठळ्या होऊन गंभीर समस्या किंवा मृत्यू देखील होऊ शकतो.
विशिष्ट परिस्थितीत, विसंगत रक्तगट माता आणि बाळासाठी धोकादायक असू शकतो. अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी, रक्तगट जुळणे महत्वाचे आहे, कारण यामुळे प्रत्यारोपित अवयवाचे शरीर सहजपणे स्वीकारू शकेल. काही विशिष्ट रक्तगट विशिष्ट आजारांसाठी अधिक संवेदनशील असू शकतात. मात्र आता रक्तगट जाणून घ्यायचा असल्यास त्यामध्ये बराच वेळ निघून जातो.
एखादा अपघात किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती झालेल्या घटनेमध्ये अपघाती नागरिकांना दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल केले जाते. त्यावेळी त्या रुग्णास रक्ताची गरज भासल्यास रक्तगट माहित नसल्यामुळे उपचारामध्ये दिरंगाई होणे किंवा चुकीचे रक्त दिले जाणे यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. आधारकार्डमध्ये आधारकार्ड धारकाचा रक्तगट समाविष्ट झाल्यास त्या व्यक्तीला कोणत्याही अपघाती घटनेमध्ये रक्त देण्याची वेळ आल्यास रक्त देण्यास सुलभ होऊ शकते, असे मानकर यांनी नमूद केले आहे.