राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर शरद पवार यांचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बंद मधून माघार

मुंबई: प्रतिनिधी 

कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाविकास आघाडीने उद्या पुकारलेल्या बंद मधून माघार घेण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयांच्या निर्देशांना त्वरित सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे शक्य नसल्यामुळे संविधानाचा आदर ठेवून बंद मधून माघार घेत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. 

बदलापूर येथे चिमुकल्या विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर महिला व मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या बंदची हाक दिली आहे. मात्र, राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा हक्क नसल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

वास्तविक कोणत्याही कृत्याचा अथवा घटनेचा निषेध करण्यासाठी बंद पुकारणे हे संविधानाला धरूनच आहे. उच्च न्यायालय ही संवैधानिक संस्था आहे. त्यामुळे संविधानाचा आदर ठेवून आपण बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

हे पण वाचा  मावळ तालुक्यातील लाचखोर मंडलाधिकारी एसीबीच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

महाराष्ट्र बंदच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सुनावणी न्यायालयात पार पडली. विधान परिषद निवडणूक जवळ आल्यामुळे राजकीय उद्देशाने हा बंद पुकारण्यात आल्याचा आक्षेप याचिकाकर्त्यांनी याचिकेत घेतला. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार नसल्याचेही याचिकेत नमूद करण्यात आले. 

बंद संदर्भात यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्ट निर्देश दिलेले असताना आमच्या हस्तक्षेपाची काय गरज, असा सवाल उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला. त्याचप्रमाणे संप करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा निर्वाळा राज्य सरकारच्या वतीने ह देण्यात आला. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt