स्वतःच स्वतःची पाठ थोपटून विकासकामांचे श्रेय लाटू नये; मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रूपेश म्हाळसकर यांचा विरोधकांना टोला
सत्ताधाऱ्यांनी बिल्डर लॉबीला मुबलक पाणी दिले; मात्र सर्वसामान्याचे पाण्यासाठी हाल; मनसेचे माजी तालुकाध्यक्ष म्हाळसकर यांचा आरोप
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
वडगाव नगरपंचायत हद्दीत सत्ताधाऱ्यांनी वडगाव शहरातील बिल्डर लॉबीला मुबलक पाणी दिले असून सर्वसामान्य नागरिकांचे मात्र पाण्यासाठी हाल केले. सत्ताधाऱ्यांकडून निवडणुकीच्या तोंडावर सोसायट्यांना पाण्याचे टँकर सुरु करुन नागरिकांना भुरळ पाडत असल्याचा आरोप मावळ मनसेचे माजी तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांनी बुधवार (दि २१) पत्रकार परिषदेत केला.
माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली ५२ दिवस जनसंवाद यात्रा झाली. १७ प्रभागातील सुमारे ७ हजार ५०० कुटुंबांना या यात्रेत भेटी दिल्या. २५ हजारापेक्षा अधिक लोकसंख्येचा सर्वे या जनसंवाद यात्रेत केला, या दरम्यान, नागरिकांनी मांडलेल्या समस्या यावर म्हाळस्कर यांनी पत्रकार परिषदेत घेत नगरपंचायतीवर व तत्कालीन सत्ताधा-यांवर ताशेरे ओढले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे, तानाजी तोडकर, संतोष म्हाळसकर, सुहास इंदलकर, मच्छिंद्र मोहिते आदी उपस्थित होते.यावेळी नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा म्हाळसकर यांनी दिला आहे
गृह प्रकल्पांचे सांडपाणी नदीमध्ये सोडले जात आहे
रुपेश म्हाळसकर म्हणाले की, “नागरिकांनी सर्वांत जास्त तक्रारी अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत केल्या. अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा असूनही सत्ताधाऱ्यांनी पाण्याचे राजकारण करत बिल्डर लॉबीला मोठ्या प्रमाणावर पाणी मात्र सर्वसामान्यांना कमी पाणी शहरातील एकमेव जलशुद्धीकरण प्रकल्प मोडकळीस आला आहे. पाच वर्षांत नागरिकांना शुद्ध व पुरेसे पाणी मिळाले नाही. गृह प्रकल्पांचे सांडपाणी नदीमध्ये जात आहे. कचरा डेपोसाठी रस्ता नसलेली जागा खरेदी करण्यात आली. तिचाही वापर होत नाही. त्याची चौकशी होण्याची गरज असल्याचेही म्हाळसकर यांनी सांगितले.पाच वर्षांत एकही घरकुल योजना राबवली नाही. गुन्हेगारी वाढली आहे.
महिला सुरक्षेसाठी उपयोजना अपुऱ्या
महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना अपुऱ्या आहेत. युवा पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात आहे. आठवडे बाजार तळ्याकाठी अपुऱ्या जागेत भरतो. शहराला प्रशस्त भाजी मंडईची गरज आहे. तालुक्याचे गाव असूनही सार्वजनिक आरोग्य सुविधा नाही. येथे नगरपंचायतीचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल होण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरात घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था नाही
शहरात घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था नाही, भाजी मंडई, बाग, बगीचा उद्याने असावी, शैक्षणिक व्यवस्था नसूनही शैक्षणिक कर कशासाठी आकारता असा सवालही म्हाळसकर यांनी या ठिकाणी उपस्थित करत स्वतःच स्वतःची पाठ थोपटून विकास कामांचे श्रेय लाटू नये असा टोला म्हाळसकरांनी लगावला.
नोंदीमध्ये पारदर्शकता हवी व कारभार चोख
कर आकारणीच्या ७७१ तक्रारी असून मालमत्तेच्या नोंदी वेळोवेळी घ्याव्यात आणि त्या नोंदीमध्ये पारदर्शकता हवी व कारभार चोख ठेवायला हवा. तसे या पाच वर्षात दिसलेले नाही. या पाच वर्षात विकास झाला नाही अशा जनसामान्यांच्या खूप तक्रारी आहेत. शहरातील समस्या सोडविण्यासाठी नगरपंचायतीकडे पाठपुरावा करण्यात येईल आणि गरज पडल्यास आंदोलन करणार, असेही म्हाळसकर यांनी सांगितले.
कर आकारणी चुकीची – वाघमारे
वडगाव नगर पंचायतीने केलेल्या चुकीच्या कर आकारणीची यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर वाघमारे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, “शहरातील मालमत्तांच्या सर्व्हेसाठी नगरपंचायतीने नेमलेल्या एजन्सीने चुकीचा सर्व्हे केला, तसेच मालमत्तांचे चुकीचे मोजमाप केले. त्यामुळे भरमसाठ कर आकारणी झाली. त्यावर ७७१ नागरिकांनी हरकती दाखल केल्या. त्यांची सुनावणी झाली, परंतु निर्णय दिला नाही.”
About The Author
