भारतात मोठे भूजल संकट!

भारतात मोठे भूजल संकट!

स्थित्यंतर / राही भिडे

भारतातील अनेक राज्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ही प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर मोठे संकट ऊभे राहण्याची शक्यता दिसते. त्यामुळे भूजल वाचवणे अत्यंत गरजेचे झाले आहे. पंजाब, हरियाणा, राजस्थान या राज्यांमध्ये पाण्याचा कमी वापर त्वरित सुरू करावा लागणार आहे. त्या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता बीड, नगर, सोलापूर या जिल्ह्यात भूगर्भातील पाण्याची पातळी पर्जन्य छायेच्या प्रदेशात असल्याने तेथे पाऊस कमी आणि उपसा जास्त आहे. शेतीतील पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबल्या पाहिजेत. कमी पाणी लागणारी पिके घेणे, पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, तलाव बांधणे, झाडे लावणे आदी उपाय करावे लागणार आहेत. तसे न झाल्यास भविष्यात मोठे जलसंकट निर्माण होऊ शकते. हा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार आणि जनतेला एकत्र काम करावे लागेल. अन्यथा, भविष्यात पाण्यासाठी अनेक समस्या निर्माण होतील.

केंद्रीय भूजल मंडळाने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्याचे नाव आहे ‘नॅशनल कम्पाइलेशन ऑन डायनॅमिक ग्राउंड वॉटर रिसोर्सेस ऑफ इंडिया.’ या अहवालात भारतातील भूजलाची म्हणजेच जमिनीखालील पाण्याची स्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये भूजलाचा अतिवापर होत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. विशेषतः पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये भूजल झपाट्याने संपत आहे. संपूर्ण देशातील ८७ टक्के भूजल शेतीसाठी वापरले जाते. याशिवाय घरे आणि कारखान्यांमध्येही भूजलाचा वापर होतो. या अहवालानुसार २०२४ मध्ये, भारतात दरवर्षी ४४६.९० अब्ज घनमीटर (बीसीएम) भूजल जमिनीवर परत येते. तर सदपाऊस आणि इतर नैसर्गिक प्रक्रियांमुळे इथले पाणी जमिनीखाली जाते. यातून ४०६.१९ ‘बीसीएम’ पाणी काढता येते; मात्र यंदा संपूर्ण देशात २४५.६४ ‘बीसीएम’ पाणी उपसा करण्यात आला. म्हणजेच देशात सरासरी ६०.४७ टक्के भूजल वापरले जात आहे. या काढलेल्या पाण्यापैकी ८७ टक्के म्हणजेच २१३.२९ ‘बीसीएम’ पाणी शेतीसाठी वापरण्यात आले. ११ टक्के म्हणजे २८.०७ ‘बीसीएम’ पाणी घरांमध्ये वापरले गेले आणि दोन टक्के म्हणजे ४.२८ ‘बीसीएम’ पाणी कारखान्यांमध्ये वापरले गेले. यावरून हे स्पष्ट होते, की भूजलाचा सर्वाधिक वापर कृषी क्षेत्र आहे. यावर नियंत्रण न ठेवल्यास भविष्यात पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते. अहवालात काही राज्यांच्या चिंतेचे कारण देण्यात आले आहे. या राज्यांमध्ये भूजलाचा वापर इतका जास्त आहे, की जमिनीत मुरलेल्या पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त पाणी काढले जात आहे. अशा राज्यांमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि दादरा नगर हवेली आणि दमण दीव यांचा समावेश होतो. या ठिकाणी भूजलाचा वापर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. देशभरात ६,७४६ ठिकाणी भूजल चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७५१ ठिकाणी परिस्थिती अत्यंत बिकट आहे. म्हणजेच या ७५१ ठिकाणी जमिनीत जेवढे पाणी येते, त्यापेक्षा जास्त पाणी काढले जात आहे. हे देशातील एकूण तपासलेल्या ठिकाणांपैकी ११.१३ टक्के आहे. याशिवाय ७१५ जिल्ह्यांबद्दल बोलायचे झाले, तर १०२ जिल्ह्यांमध्ये भूजलाचा वापर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यापैकी ६४ जिल्हे पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या तीन राज्यांत आहेत. पंजाबमधील २३ पैकी १९ जिल्हे, हरियाणातील २२ पैकी १६ जिल्हे आणि राजस्थानमधील ३३ पैकी २९ जिल्हे या यादीत आहेत. यावरून या राज्यांमध्ये भूजलाची स्थिती किती गंभीर आहे, हे लक्षात येते.

पंजाबमध्ये भूजलाचा वापर खूप जास्त आहे. येथे २०२४ मध्ये भूजलाचा वापर १५६.८७ टक्के होता. म्हणजे जेवढे पाणी जमिनीत येते, त्यापेक्षा दीडपट जास्त पाणी काढले जात आहे. अहवालानुसार, पंजाबमध्ये दरवर्षी १९.१९ ‘बीसीएम’ पाणी जमिनीवर परत येते. यातून १७.६३ ‘बीसीएम’ पाणी काढता येते; मात्र यंदा २७.६६ ‘बीसीएम’ पाणी उपसा करण्यात आला. या काढलेल्या पाण्यापैकी २६.२४ ‘बीसीएम’ शेतीसाठी वापरण्यात आले. पंजाबमध्ये १५३ ठिकाणी तपास करण्यात आला. त्यापैकी ११५ ठिकाणी परिस्थिती अत्यंत बिकट आहे. या बाबतीत संगरूर जिल्हा आघाडीवर आहे. तेथील भूजलाचा वापर ३१३.२४ टक्के आहे. म्हणजे जमिनीत जेवढे पाणी येते, त्याच्या तिप्पट पाणी काढले जात आहे. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. हरियाणातही तशीच परिस्थिती आहे. हरियाणात १४३ ठिकाणी तपास करण्यात आला. यापैकी ८८ ठिकाणी भूजलाचा वापर जास्त आहे. म्हणजे ६१.५४ टक्के ठिकाणी परिस्थिती वाईट आहे. कुरुक्षेत्र जिल्ह्यातून सर्वाधिक २२८.४२ टक्के पाणी उपसा करण्यात आला. यावरून हरियाणातही शेतीसाठी भूजलावर बरेच अवलंबून असल्याचे दिसून येते. असेच सुरू राहिल्यास गंभीर पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. राजस्थानमध्ये भूजलाचा वापर १४९.८६ टक्के आहे. येथे दरवर्षी १२.५८ ‘बीसीएम’ पाणी जमिनीत येते. यातून ११.३७ ‘बीसीएम’ काढता येते; मात्र १७.०५ ‘बीसीएम’ पाणी काढण्यात आले. यातील १४.५१ ‘बीसीएम’ पाणी शेतीसाठी वापरण्यात आले. राजस्थानमध्ये ३०२ ठिकाणी तपास करण्यात आला. त्यापैकी २१४ ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. म्हणजे ७०.८६ टक्के ठिकाणी भूजलाचा वापर खूप जास्त आहे. जैसलमेर जिल्ह्यातून सर्वाधिक २२८.४२ टक्के पाणी उपसा करण्यात आला. संपूर्ण देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे. राजस्थानमध्ये आधीच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय भूजलाचा अतिवापर केल्याने परिस्थिती अधिकच बिकट होत आहे.

हे पण वाचा  महाशक्तीच्या महाप्रमुखांच्या कोलांटउड्या!

तामिळनाडूमध्ये सरासरी ७४.२६ टक्के भूजल वापरले गेले. हे देशाच्या सरासरीपेक्षा जास्त नाही; परंतु ९ जिल्ह्यांमध्ये ते शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दरवर्षी २१.५१ ‘बीसीएम’ पाणी जमिनीत येते. यातून १९.४६ ‘बीसीएम’ काढता येते; मात्र १४.४५ ‘बीसीएम’ पाणी काढण्यात आले. यातील १३.५१ ‘बीसीएम’ पाणी शेतीसाठी वापरण्यात आले.इतर काही राज्यांमध्येही भूजलाचा वापर हा चिंतेचा विषय आहे. मध्य प्रदेशातील ६ जिल्हे, उत्तर प्रदेशातील ५ जिल्हे, कर्नाटकातील ५ जिल्हे, गुजरातमधील ४ जिल्हे आणि तेलंगणातील हैदराबादमध्ये भूजलाचा वापर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या ठिकाणीही पाणीटंचाईचा धोका वाढत आहे. प्रत्येक क्षेत्रात भूजल कमी होण्याचे कारण वेगळे असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांसारख्या उत्तर-पश्चिम भागात भूजल भरपूर आहे; पण लोक त्याचा अतिरेक करत आहेत. राजस्थान आणि गुजरातसारख्या पश्चिम भागात कोरडे भाग आहेत. येथे पाऊस कमी आहे, त्यामुळे जमिनीत पाणी कमी मुरते. कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणासारख्या दक्षिणेकडील भागात असे खडक आहेत, जे कमी पाणी धरून ठेवतात. या कारणांमुळे भूजलाचे प्रमाण कमी होत आहे. भूजलाचा वापर असाच होत राहिला गंभीर समस्या निर्माण होतील. सर्व प्रथम पाण्याची टंचाई असेल. शेती, घरे, कारखान्यांना पाणी शिल्लक राहणार नाही. शेतीला मोठा फटका बसणार आहे. पिके कमी होतील आणि शेतकऱ्यांची कमाई कमी होईल. निसर्गाचीही हानी होईल. विहिरी कोरड्या पडतील, तलाव रिकामे होतील आणि जमीन पडीक पडू शकते. याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. पाण्याअभावी अनेक कामे थांबू शकतात. अहवालात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. काही राज्यांमध्ये भूजल वापराचा अतिरेक झाला आहे. पंजाबमध्ये सतलज, बियास आणि रावी या तीन मोठ्या नद्या आहेत, तरीही भूजलाचा वापर १५६.८७ टक्के आहे. देशात सरासरी ६०.४७ टक्के भूजल वापरले जात आहे. ६,७४६ ठिकाणांपैकी ७५१ ठिकाणी परिस्थिती वाईट असल्याचे सांगण्यात आले.

000

 

About The Author

Rahi Bhide Picture

जेष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक

Related Posts

Advertisement

Latest News

 चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र चाफेकर बंधुंचे स्मारक देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र
चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण  पिंपरी: प्रतिनिधी 'हुतात्मांच्या कार्यातून देशभक्तीची प्रेरणा मिळत असते. चापेकर बंधु अशाच हुतात्मांपैकी एक होते....
'भाषा शिकण्यावरून वाद हा रिकाम टेकड्यांचा उद्योग'
चाकणसह छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार टेस्लाचे उत्पादन
संग्राम थोपटे लवकरच होणार भाजपमध्ये डेरेदाखल
'... ही मागणी पांडुरंगाकडे करण्याचे कारणच नाही'
'वी द पीपल;'ने जागवल्या बहुजन महानायकांच्या स्मृती
माळशिरस तालुक्यात संपणार पाण्याचा वनवास

Advt