कराड येथे नवोदित साहित्य संमेलनाचे आयोजन
शरद पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन
कराड: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन ९ व १० मे २०२५ रोजी कराड संपन्न होणार आहे. या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा आज साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी केली. ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलन असा भरगच्च कार्यक्रम होणार असून या संमेलनात देशभरातील ९०० साहित्यिक उपस्थित राहणार आहेत.
यापूर्वी पुणे, मुंबई, नांदेड, उदगीर, तुळजापूर, लातूर, धाराशिव, वणी, रत्नागिरी, गोंदिया, शेवगाव, बारामती, मंठा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर याठिकाणी संपन्न झाले होते. नारायण सुर्वे, मंगेश पाडगांवकर, द.मा. मिराजदार, शिवाजी सावंत, सुरेश भट, केशव मेश्राम, विश्वास पाटील, सुवर्णा पवार, श्रीपाल सबनीस, म.दा.हातकणगलेकर, गंगाधर पाणतावणे, जनार्दन वाघमारे, आ.ह.साळुंखे, आदी मान्यवर साहित्यिकांनी या संमेलानाचे संमेलनाध्यक्षपद भूषिवले आहे. तर डॉ.डी.वाय.पाटील, बी.जी.शिर्के, उदय सामंत, सुधीर तांबे, प्रा.शिवाजीराव सावंत, यासारख्या दिग्गजांनी स्वागताध्यक्षपद भूषिवले आहे. जावेद अख्तर, पु.ल.देशपांडे, रमाकांत खलप या मान्यवरांनी संमेलनाचे उद्घाटन केले आहे.
या पत्रकार परिषदेत साहित्य परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष
डॉ. नितीन नाळे, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष विकास भोसले, सातारा जिल्हा अध्यक्ष संदीप पवार, महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.हनुमंत चिकणे, कराड तालुका अध्यक्ष डॉ. शंकरराव खापे, कराड तालुका उपाध्यक्ष डॉ.दादाराम साळुंखे, कराड तालुका सचिव प्रकाश पिसाळ, किशोर पाटील, मानसिंग पाटील, वामन अवसरे, सुशील कांबळे, रामचंद्र पाटील, विजय कोळेकर, विद्या पवार आदी मान्यवर उपस्थित होते.