'महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हवा कठोर कायदा'

छत्रपती उदयनराजे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी

'महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी हवा कठोर कायदा'

पुणे: प्रतिनिधी

छत्रपती शिवरायांसह ज्या महापुरुषांनी देश घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले अशा महापुरुषांचा अवमान करण्याची प्रवृत्ती सध्या वेगाने वाढताना दिसत आहे. या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कठोरात कठोर कायदा अमलात आणावा, अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्या अवमानकारक वक्तव्यांचा संदर्भ घेऊन उदयनराजे यांनी मुख्यमंत्री व  उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या. 

छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात समतेचा आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. एकमेव असा राजा, युगपुरूष होऊन गेला, ज्याने नेहमी लोकांसाठी आयुष्य वेचले. रयतेसाठी स्वराज्याची स्थापना केली आणि आज आपण जी लोकशाही पाहत आहोत त्या मागचा विचार शिवछत्रपतींनी त्या काळात दिला. लोकांचा सहभाग राज्यकारभारात असला पाहिजे याचा मूळ पाया शिवाजी महाराजांनी रचला.

हे पण वाचा  'छत्रपती शिवाजी महाराज देशासह जगासाठी प्रेरणास्थान'

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यातील प्रत्येक क्षण लोकांसाठी वेचला त्यांचा अवमान केला जातो. या घटना वाढताना दित आहेत. त्यामुळे या ठिकाणी मी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी काही महत्त्वाच्या मागण्या करणार आहे. शिवछत्रपतींसारख्या महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कठोरात कठोर कायदा अमलात आणावा. या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना जामिनावर सुटका करून घेता येऊ नये. या कायद्यांतर्गत तब्बल दहा वर्ष कारावासाची शिक्षा असावी. त्याचप्रमाणे लोकांमध्ये इतिहासाबद्दल संभ्रम, भेदभाव आणि त्यातून तेढ निर्माण होऊ नये यासाठी खुद्द शासनानेच संपूर्ण शासनमान्य असा इतिहास प्रकाशित करावा, अशा मागण्या उदयनराजे भोसले यांनी केल्या.  

About The Author

Advertisement

Latest News

Advt