मधमाशा पालन, संवर्धनासाठी जनजागृती हवी:डॉ.सावंत
'मधमाशांचे महत्त्व 'व्याख्यानाला चांगला प्रतिसाद
पुणे: जागतिक मधमाशी दिनानिमित्त 'जीविधा 'या संस्थेच्या वतीने 'मानवी जीवनात मधमाशांचे महत्त्व' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.या व्याख्यानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मध, मधमाशा आणि मधमाशी पालन यांचे तज्ज्ञ व संशोधक डॉ. प्रशांत सीता रामचंद्र सावंत यांनी मार्गदर्शन केले.
हे व्याख्यान मंगळवार, २० मे २०२५ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र(सचिन तेंडुलकर जॉगिंग पार्कसमोर, राजेंद्र नगर, म्हात्रे पुलाजवळ, पुणे) येथे झाले .हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता पर्यावरण, मधमाशी पालन व नैसर्गिक संवर्धनात रस असलेल्या नागरिक उपस्थित होते. 'जीविधा' चे संस्थापक राजीव पंडित,सौ.वृंदा पंडित यांनी स्वागत केले. डॉ. प्रशांत सीता रामचंद्र सावंत म्हणाले,'
मधमाश्या नष्ट झाल्या तर मनुष्यजात नष्ट होईल,असे आईनस्टाईन यांनी सांगितले होते. मधमाशांवर मानवी जीवनाचे अस्तित्व अवलंबून आहे.मधमाशी पर-परागीकरण प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतात.त्यामुळे शेती,जंगल,फळझाडात वृद्धी होती.आग्या(रॉक बी) या मधमाशा फक्त आशियात आढळतात. विकास प्रक्रिया,रसायनांमुळे फुलपाखरू,मधमाशा कमी होऊ लागल्या आहेत. मधमाशा पालन आणि संवर्धनासाठी जनजागृती केली पाहिजे.
मानवाने चाखलेला पहिला गोड पदार्थ हा मधच होता.इसवी सन पूर्वी ४ हजार पूर्वी पासून मधाचे उल्लेख आढळतात.जगात ४५ हजार पेक्षा अधिक मधमाशा आहेत.परागकणांचा मध आणि फुलांच्या देठात मकरंद असतो,या दोन्ही वेगळया गोष्टी आहेत. उघड्यावर पोळे बांधणाऱ्या,अंधाऱ्या जागेत पोळे बांधणाऱ्या मधमाशा वेगळया आहेत.आग्या मधमाशा दुर्गम,कडेकपारीत असते.एक मधमाशी वर्षाला १२ किलोपर्यंत मध गोळा करते.मानवाला डंख मारल्यावर मधमाशी मरते,हे लक्षात घेतले पाहिजे.
मधमाशी पालनाने कृषी, बागायती पिकांची उत्पादकता वाढू शकते. मध,मेण, परागकण, रोंदण, राजान्न(रॉयल जेल), विष,परागीभवन केलेले अन्न असे अनेक पदार्थ मधमाशांकडून मिळतात.४८ प्रकारचे रोजगार निर्माण करता येते. ग्रामीण विकासाला चालना देता येते, असे सावंत यांनी सांगितले.
पोळे न तोडता,पिळता मध मिळवणे हे खरे तंत्र आहे.ते शिकले पाहिजे. पेट्यांमध्ये मधमाशी पालन करताना विविध राज्यातील पेट्या बदलणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असेही ते म्हणाले.
000