'शिंदे यांच्याबरोबर गेलेले बारा आमदार पुन्हा ठाकरे यांच्याकडे येणार'
उद्धव ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
तत्कालीन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला आव्हान दे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांपैकी बारा आमदार पुन्हा ठाकरे यांच्या गटात परतणार असल्याचा दावा ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी केला. त्यांनी या आमदारांच्या नावांची यादीच वाचून दाखवली. लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना सरोदे यांनी केलेल्या जाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
श्रीनिवास वनगा, लता सोनवणे, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे, बालाजी कल्याणकर, चिमणराव पाटील, नितीनकुमार तळे, प्रदीप जैसवाल, उदयसिंह राजपूत, महेश शिंदे, प्रकाश आबिटकर हे आमदार उद्धव ठाकरेंकडे परतणार आहेत असा दावा असीम सरोदेंनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या पलीकडे ओळख नाही. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला राजकीय भवितव्य नाही याची जाणीव शिंदे यांच्याबरोबर गेलेले आमदारांना झाली आहे. त्यामुळे ते लवकरच उद्धव ठाकरे यांच्याकडे परत येतील, असा दावा सरोदे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून शिंदे आणि त्यांचा गट भाजपच्या वळचणीला आल्यानंतर शिंदे गटातील मंत्री पदाची इच्छुक असलेले अनेक आमदार गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते. मात्र अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट ही महायुतीत सहभागी झाल्याने सत्तेतील वाटेकरी वाढले आणि शिंदे गटातील अनेकांना मंत्रीपदापासून वंचित राहावे लागले. त्यापैकी काहींनी आपली नाराजी त्यावेळी जाहीरपणे व्यक्त केली होती.
सध्याच्या काळातही लोकसभा निवडणुका तोंडावर असताना महायुतीमध्ये जागावाटप झालेले नाही भारतीय जनता पक्षाने राज्यातील वीस मतदारसंघात आपले उमेदवार जाहीर केले आहे. उरलेल्या 28 जागांपैकी किती आणि कोणत्या जागा भाजप स्वतःकडे ठेवणार किती राष्ट्रवादी काँग्रेसला देणार आणि किती शिंदे गटाला मिळणार हे अध्यक्ष स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर सरोदे यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
Comment List