थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल
वर्षभराचे लक्ष्य सहा महिन्यात केले पूर्ण
मुंबई: प्रतिनिधी
थेट परदेशी गुंतवणूक मिळवण्याबाबत देशभरात महाराष्ट्राच अव्वल ठरला आहे. थेट परदेशी गुंतवणुकीचे वर्षभरासाठी निश्चित करण्यात आलेले लक्ष्य राज्याने सहा महिन्यातच पूर्ण केले आहे, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
आर्थिक वर्ष 2024- 25 दुसरी तिमाही सप्टेंबरमध्ये संपली असून त्याची आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. ही आकडेवारीच मुख्यमंत्र्यांनी सादर केली. चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यातच १ लाख १३ हजार २६३ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक राज्यात झाली आहे.
मागील चार वर्षाचा आढावा घेतला असता राज्यात दरवर्षी सरासरी १ लाख ११ हजार ५५६ कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक होत आहे. याचा अर्थ या सहा महिन्यातच राज्यात ९४. ७१ टक्के गुंतवणूक झाली आहे, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
या कामगिरीसाठी मी महाराष्ट्राचे अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजित दादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची घोडदौड अशीच सुरू राहील, अशी ग्वाही देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.