स्वबळ की महायुती? भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष
पुणे: प्रतिनिधी
दीर्घकाळाच्या प्रतीक्षेनंतर लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून उतरायचे की स्वबळावर, या पेचामुळे विशेषतः राज्याच्या राजकारणात मोठा भाऊ ठरलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. पुण्यासारख्या महापालिकांमध्ये स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचा स्वबळाचा आग्रह आहे तर नेत्यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.
कधी कोरोना सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे तर कधी राजकीय अनुकूलता नसल्यामुळे महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तब्बल तीन वर्षाहून अधिक काळ रखडलेले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था प्रशासकांच्या ताब्यात आहेत तर स्थानिक राजकारणात प्रस्थापित होण्याच्या प्रतीक्षेत असलेले कार्यकर्ते गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकांची वाट बघत आहेत.
भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र आहेत. ज्या ज्या ठिकाणी पूर्ण सहमतीने महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढणे शक्य असेल त्या त्या ठिकाणी एकत्र निवडणुका लढवू. ज्या ठिकाणी सहमती होणार नाही त्या ठिकाणी एकमेकांवर टीकाटिप्पणी न करता सामोपचाराने स्वतंत्र लढू, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच जाहीर केली आहे.
मात्र, पुण्यासारख्या अनेक महापालिकांमध्ये स्वबळावर महापालिका निवडणूक लढविण्याचा स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांचा आग्रह आहे. दुसरीकडे मुंबईसारखी महापालिका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सामना करून खेचून घ्यायची असेल तर शिवसेनेची मदत घेतल्या वाचून भाजपला पर्याय नाही. अशा परिस्थितीत महापालिका निवडणूक हे भाजपसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अधिकाधिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देऊन बळ देणे शक्य होते. युती किंवा आघाडी असल्यास त्याला मर्यादा येते. अर्थातच त्यामुळे पक्षवाढीला देखील काही प्रमाणात खीळ बसते. त्यामुळे या निवडणुका युती म्हणून लढल्या तर भाजपला आपल्याच कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर पक्षवाढीला येणाऱ्या मर्यादांचे आव्हान असणार आहे.