'राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

'राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे अराजकतावाद्यांना बळ'

पुणे: प्रतिनिधी 

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या भ्रामक विचारांमुळे देशात अराजक निर्माण करण्याचा कट करणाऱ्या शक्तींना बळ मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

'जयपूर डायलॉग'च्या डेक्कन समिट कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर आणि जयपूर डायलॉगचे प्रमुख संजय दीक्षित यांनी फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधी यांच्यावर कठोर शब्दात हल्ला चढवला. 

राहुल गांधी यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीपेक्षा महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 40 लाख मतदार वाढल्याचा दाखला देऊन हे भारतीय जनता पक्षाचे 'व्होट इंजीनियरिंग' असल्याचा आरोप केला होता. या आरोपाचा फडणवीस यांनी समाचार घेतला. 

राहुल गांधी यांनी आपल्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला तरच त्यांचा पक्ष टिकून राहू शकेल. मात्र, ते केवळ बहाणेच शोधत राहिले तर आगामी काळात काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस यांनी सुनावले. विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांचा फरक असल्याची आठवणही त्यांनी करून दिली. 

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, राहुल गांधी हे सतत भ्रमात राहणारे नेते आहेत. जनतेने त्यांची साथ सोडली आहे याची जाणीवही त्यांना होत नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासारख्यांना बरोबर घेऊन त्यांनी पत्रकार परिषदा घेतल्या तर त्यांचे विचारही तसेच राहणार. मात्र या भ्रामक विचारांमुळे राजकतावाद्यांना बळ मिळत आहे. देशातील संवैधानिक यंत्रणाबाबत अपप्रचार करून त्यांच्याबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा 180 अराजकतावादी संघटनांचा कट आहे. राहुल गांधी यांच्या भ्रामक विधानांमुळे त्यांना बळ मिळते आहे, असे फडणवीस म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपची लढाई या अराजकतावादी संघटनांशी होती. त्यांनीच भाजपबद्दल अनेक 'फेक नरेटिव्ह' मतदारांमध्ये पसरवली. त्याला तोडीस तोड उत्तर देण्यात आम्ही कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत मात्र अशा अपप्रचाराला सडेतोड उत्तर देण्याची यंत्रणा संघ परिवारातच असल्याचे लक्षात घेऊन आम्ही संघ परिवारातील विविध संस्था संघटनांच्या सहकार्याने उत्तम कामगिरी करू शकलो, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

माध्यमांनाही सुनावले खडे बोल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या सतत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या केवळ करमणूक करणाऱ्या आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाहीत. एकनाथ शिंदे हे धीरगंभीर व्यक्तिमत्त्वाचे नेते आहेत. त्यांची तशीच छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांच्या नाराजीच्या बातम्या पसरविल्या गेल्या, असे सांगतानाच फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांमध्ये सर्जनशीलता राहिलेली नाही. माहितीच्या मुळाशी जाण्याची, खात्री करून घेण्याची, शोध घेण्याची, नवनवीन विषयांना भेटण्याची वृत्ती आणि गांभीर्य माध्यमांमध्ये राहिले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबद फडणवीसांचा खुलासा
भाजप आणि शिवसेना युती अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावरून संपुष्टात आल्याचा संपूर्ण वृत्तांत देखील फडणवीस यांनी सविस्तर कथन केला. वास्तविक तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि तत्कालीन शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुकीपूर्वीच साटेलोटे झाले असल्याचा दावा त्यांनी केला. 

जयपूर डायलॉग हा राष्ट्रीय विचारांचा मंच

जयपुर डायलॉगने राष्ट्रीय विचारांना एक व्यापक मंच उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. त्याचप्रमाणे जो इतिहास आजपर्यंत झाकला गेला तो नव्या पिढीसमोर आणण्याचे आवश्यक कार्यही या माध्यमातून केले जात आहे, अशा शब्दात कौतुक करतानाच फडणवीस यांनी आपण जयपूर डायलॉगच्या कायम पाठीशी राहू, अशी ग्वाही देखील दिली.

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us