इस्लामाबादसह पाकिस्तानच्या सात शहरांवर ड्रोन हल्ले
भारतात आलेली पाकिस्तानची लढाऊ विमाने, ड्रोन आणि क्षेपणास्त्र उध्वस्त
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतात घुसून हल्ला करण्याच्या पाकिस्तानच्या उद्दाम कृत्याला भारताने सणसणीत चपराक लगावली आहे. भारतात चालून आलेली पाकिस्तानची चार लढाऊ विमाने जमीनदोस्त झाली असून दोन वैमानिकांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच त्यांची सात क्षेपणास्त्र आणि ७० ड्रोन भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणेने निकामी केली आहेत.
आज संध्याकाळी सूर्यास्तानंतर पाकिस्तानने जम्मूच्या विमानतळावर क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. मात्र, भारताच्या एस 400 आणि आकाश या हवाई सुरक्षा यंत्रणांनी ती हवेतच निकामी करून टाकली. त्याचप्रमाणे पाकिस्तानने श्रीनगर, चंदीगड, जम्मू यासह राजस्थानातील जैसलमेर, बारमेर अशा ठिकाणी ड्रोन हल्ला केला. हे ड्रोन देखील हवाई सुरक्षा यंत्रणांनी हवेतच गिळंकृत केले. सन 1971 मध्ये झालेल्या सर्वंकष युद्धानंतर प्रथमच राजस्थानात युद्धपरिस्थिती निर्माण झाली आहे.
हा हल्ला करून पाकिस्तानने स्वतःच्या पायावरच नव्हे तर डोक्यात दगड घालून घेतला आहे. अद्याप युद्धाची अधिकृत घोषणा झाली नसली तरी देखील पाकिस्तानने भारतावर हल्ला करून युद्ध अंगावर ओढवून घेतले आहे. पाकिस्तानचा हल्ला परतवून लावल्यानंतर भारताने पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादसह लाहोर आणि अन्य पाच मोठ्या शहरांवर ड्रोन हल्ले चढवले आहेत. पाकिस्तानची लाहोर येथे तैनात करण्यात आलेली हवाई सुरक्षा यंत्रणा भारताने आधीच निकामी करून टाकली आहे. त्यामुळे पंजाब प्रांतातील या शहरांचा भारतीय हल्ल्यांपुढे निभाव लागणे. कठीण आहे.