सुदर्शनचक्राने केले पाक हवाई हल्ल्यापासून भारताचे संरक्षण
पाकिस्तानने केला होता ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हल्ला
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पाकिस्तानने भारतीय सैन्याच्या विविध ठिकाणी असलेल्या आस्थापनांवर दोन आणि क्षेपणास्त्रांच्याद्वारे हल्ला चढवला होता. मात्र, सुदर्शन चक्र अर्थात 'एस 400' या रशियाने भारताला दिलेल्या अत्याधुनिक आणि कार्यक्षम हवाई संरक्षण प्रणालीने हा हल्ला निष्प्रभ करून पाकिस्तानची शस्त्रे हवेतच नष्ट केल्याचा दावा भारताकडून अधिकृतपणे करण्यात आला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव टोकापर्यंत ताणला गेला आहे. भारत आणि पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मूकाश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. त्यासाठी भारताने हाती घेतलेली 'ऑपरेशन सिंदूर' ही मोहीम अद्याप थांबली नसल्याची जाणीव भारताने पाकिस्तानला आजच करून दिली आहे.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याप्रमाणेच पाकिस्तानने देखील सात व आठ मे रोजी भारतातील श्रीनगर, जम्मू, चंदीगड, लुधियाना, अमृतसर, भटिंडा फालोद आणि भू अशा ठिकाणी असलेल्या 15 लष्करी तळांवर हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ड्रोन आणि क्रूज मिसाइल्स, बॅलेस्टिक मिसाईलचा वापर करण्यात आला. मात्र, एस 400 या रशियन बनावटीची आणि आकाश ही भारतीय बनावटीची हवाई सुरक्षा यंत्रणा यामुळे भारताला हवाई हल्ल्यापासून कडेकोट संरक्षण प्राप्त झाले आहे. पाकिस्तानकडून झालेले हल्ले परतवून लावत भारताच्या हवाई सुरक्षा यंत्रणांनी आपली क्षमता सिद्ध केली आहे.
एस 400 ही सध्याच्या काळात जगातील सर्वात प्रभावशाली हवाई सुरक्षा प्रणाली समजली जाते. भारत व पाकिस्तान आणि भारत व चीन यांच्यातील तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या पाच एस 400 यंत्रणांना सीमेवर मोक्याच्या जागी तैनात केले आहे. त्यांनी आपले काम योग्य तऱ्हेने बजावत भारताचे पाकिस्तानच्या हल्ल्यापासून संरक्षण केले आहे. उलट पाकिस्तानला चीनकडून मिळालेली हवाई सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. लाहोर येथे तैनात करण्यात आलेली पाकिस्तानी हवाई सुरक्षा यंत्रणा निकामी करून भारतीय क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा अचूकपणे वेध घेतला आहे.