पुणेकरांचे प्रेम कधीही विसरू शकत नाही: अशोक सराफ
कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ कला जीवन गौरव पुरस्कार
पुणे : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण अशा थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्यच आहे. पुणेकरांनी आजपर्यंत मला भरभरून प्रेम दिले आहे, त्यांचे हे प्रेम मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळालेले पुरस्कार मी जपून ठेवले असून ते मला सतत ऊर्जा देणारे आहेत, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली.
स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालॉज मित्र मंडळातर्फे पहिले मुख्यमंत्री, लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण कला व साहित्य पुरस्कार समारंभात कै. प्रकाश ढेरे स्मृत्यर्थ ‘कला जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ मराठी अभिनेते अशोक सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिरात प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते नागराज मंजुळे उपस्थित होते.
याप्रसंगी सुनिता झाडे (नागपूर) यांना 'शब्दांच्या पसाऱ्यातील आत्महत्या' या कविता संग्रहासाठी कै. शिवाजीराव अमृतराव ढेरे यांच्या स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्कार’, फेलिक्स डिसोजा (वसई) यांना आरशात ऐकु येणार प्रेम या कविता संग्रहासाठी कै. बाबासाहेब जाधव यांच्या स्मृत्यर्थ साहित्य पुरस्कार, सफर अली इसफ (वैभववाडी) यांना 'अल्लाद ईश्वर' कवितासंग्रहासाठी कै. धनाजी जाधव स्मृत्यर्थ ‘साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जेष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ, ज्येष्ठ कवी व वात्रटिकाकार रामदास फुटाणे, जेष्ठ लेखक व कवी प्रा. फ.मु. शिंदे, अशोक नायगावकर, ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, गौरव फुटाणे, सचिन जाधव, कुणाल जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, थोर व्यक्तीच्या नावाने मला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार माझा सन्मान आहे, प्रेम मी विसरणार नाही. स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचा ऋणी आहे. पुणेकरांनी नेहमीच माझे कौतुक केले याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.
डॉ. मोहन आगाशे म्हणाले, अशोक सराफ हा कलाकार तळागाळात मिसळणारा आहे. त्यांच्यात बडेजावपणा, इगो अजिबात नाही. कधीही केव्हाही भेटणारा साधा सरळ हा माणूस आहे. साध्या सरळ माणसाला हा पुरस्कार मिळाल्याने खरोखर आनंद आहे.
नागराज मंजुळे म्हणाले, अशोक मामाच्या साध्या आणि सरळ स्वभावामुळे मीच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र त्यांचा चाहता आहे. हा माणूस आभाळासारखा आहे. कारण मी त्यांना अनुभवलं आहे. मी काहीही नसताना त्यांचा बाईट घेण्यासाठी गेलो असता, कुठून आला, कोण आहेस असे कोणतेही आढेवेढे न घेता माझ्या खांद्यावर हात ठेवून मला पहिला बाईट दिला. हा माणूस चित्रपट क्षेत्रातलाच नव्हे तर खऱ्या जीवनातला देखील हिरो आहे, सही यावेळी त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ढेरे व जाधव परिवाराने गेली 39 वर्षे कार्यक्रमातून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन ठेवल्या आहेत. यशवंतराव चव्हाण यांचा संस्कृतपणा आणि राजकारण पुढे घेऊन जायचे आहे. सध्याची महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृतपणा हरवत चाललेला आहे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जोपासण्याचे आपले सर्वांचे काम आहे. यशवंतरावाचा सुसंस्कृतपणा ढेरे-जाधव परिवार जोपासत आहे कौतुकास्पद आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले.
Comment List