पाकिस्तानवरील कारवाईचे सर्वाधिकार सैन्याकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय
नवी दिल्ली: प्रतिनिधी
भारतीय सैन्यदलावर आपला पूर्ण विश्वास आहे. दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात कधी कारवाई करायची, याचा निर्णय सैन्यदलांनी घ्यावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांबरोबर मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांची बैठक पार पडली. या बैठकीत पाकिस्तानवर कारवाई कधी करायची याबाबतचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी सैन्यदलांवर सोपवला आहे.
या बैठकीनंतर मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरही स्वतंत्रपणे चर्चा केली. या बैठकांच्या सत्रापाठोपाठच संरक्षण विषयक मंत्रिमंडळ समितीची पहलगाम हल्ल्यानंतर दुसरी बैठक आज पार पडणार आहे.
या सगळ्या घडामोडींवरून पाकिस्तानच्या विरोधातील कारवाईच्या निर्णयप्रक्रियेला वेग आल्याचे दिसून येत आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी प्रथमच 22 तारखेला पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी आहेत. या हल्लेखोरांपैकी एक जण पाकिस्तानच्या स्पेशल फोर्सचा निवृत्त पॅरा कमांडो असल्याचे उघड झाले असून त्यामुळे या हल्ल्यातील पाकिस्तानची भूमिका स्पष्ट झाली आहे. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी केली जात आहे. याबाबत जगभरातील प्रमुख देशांनी देखील भारताला पाठिंबा व्यक्त केला आहे.