भारतात जातीवर आधारित जनगणना होणार
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली: प्रतिनिधी
देशभरात जातीवर आधारित जनगणना करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली.
पहलगाम दहशतवादी हल्ला, भारताची या भेकड हल्ल्याचा बदला घेण्यासाठीची तयारी आणि आतून तुटून देखील सुरू असलेल्या पाकिस्तानच्या वल्गना, या सर्व पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी या विषयावर या विषयावर एक शब्द देखील काढला नाही.
दीर्घ काळापासून विरोधी पक्षांनी देशात जातिनिहाय जनगणना व्हावी, अशी मागणी लावून धरली होती. शासकीय यंत्रणांमध्ये, विविध विभागांमध्ये विविध जातिसमूहांना किती प्रतिनिधित्व मिळाले आहे, हे समजून घेण्यासाठी जातिनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
इंडी आघाडीने सत्तेवर आल्यास जातिनिहाय जनगणना करण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते आणि तो प्रचाराचा प्रमुख मुद्दाही केला होता. दुसरीकडे जातिनिहाय जनगणना झाल्यास भारतीय समाजातील जातीय वीण उसवण्याची भीती सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली होती.
या पार्श्वभूमीवर सरकारने जाहीर केलेल्या जातिनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.