घंटागाडी येत नसल्याने वाहात्या रस्त्यावर कचऱ्याचा गतिरोधक ; नागरिकाच्या सहनशिलतेचा उद्रेक!
कुर्डुवाडी, शिरीषकुमार महामुनी
घंटागाडी येत नाही कचरा उचलला जात नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रार व पाठपुरावा करूनही अखेर महिनाभराने साठलेला कचरा नाइलाजाने तक्रारकर्ते रोहित मराळ यांनी स्वतः उचलून कुर्डुवाडी -माढा रस्त्यावर गतिरोधक स्वरुपात टाकला. यामुळे काही काळ रहदारीला अडथळा झाला .तेंव्हा कुठे नगरपालिकेला जाग आली आणि लागलीच रात्री ट्रॅक्टर व तीन कर्मचारी यांनी रा.१० वा. सुमारास नगरपालिकेने सदर कचरा उचलला. मुळात नागरिक सर्व कर वेळेवर भरत असताना त्याच्यावर व नगरपालिकेवरही ही नामुष्की का आली याचे आत्मपरिक्षण प्रशासन आणि नागरिकांनीही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
कुर्डुवाडी नगरपालिकेवर प्रशासक नेमल्यापासून नागरिकांना मूलभूत गरजांसाठी कायम झगडावे लागत आहे. रस्ते, पाणी, गटार, वीज कोणतीच सुविधा ही सुरळीत नसून केवळ टेंडर,ठेकेदार आणि त्यावरचा मलिदा एवढेच काही सुरळीत आणि वेळेत होत आहे. एरवी कोणालाही न भेटणारे अदृश्य स्वरूपात वावरणारे मुख्याधिकारी टेंडर प्रक्रियेवेळी मात्र आवर्जून उपस्थित असतात असा नागरिकांचा आरोप आहे.
यंदा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला असून अद्यापही शहरातील नाले सफाई झाली नाही. त्यामुळे सदर ठिकाणी गाळ साठून नागरिकांच्या घरात उलट दिशेने पाणी जाऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील नागरिक जे महिनाभर कुर्डुवाडी नगरपालिकेत कचरा उचलण्यासाठी घंटा गाडी, गटार काढण्यासाठी आपले गाऱ्हाणे मांडत होते. मात्र प्रशासनाला कसलीच जाग आली नाही. त्याच संतापाचा उद्रेक होऊन आज माढा रोड येथे रात्री ९ वा.सुमारास येथील नागरिक रोहित मराळ यांनी सदर कचरा स्वतःच्या हाताने उचलून वाहात्या माढा रस्त्यावर कचऱ्याचा ढिग गतिरोधक स्वरूपाचा मांडला .तेंव्हा कुठे नगरपालिका प्रशासन जागे झाले आणि सदर रस्त्यावरील कचरा त्यांनी रात्रीतून तत्परता दाखवत उचलून नेला.
प्रशासनाने नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये आज कचरा रस्त्यावर टाकला पुढे तो कुठपर्यंत येईल हे सांगता येत नाही.तरी प्रशासनाने वेळीच याची नोंद घ्यावी असे नागरिकांतून बोलले जात आहे.
गेली महिनाभर मी कुर्डुवाडी नगरपालिकेत कचरा उचलण्यासाठी घंटागाडी येत नाही याचे गाऱ्हाणे मांडत आहे. पण कोणीच दखल घेतली नाही. मी कचरा रस्त्यावर टाकण्यापूर्वीही नगरपालिकेत जाऊन माहिती दिली होती. मुख्याधिकारी यांना फोन देखील केले पण कोणताच प्रतिसाद नसल्यामुळे मी नाइलाजास्तव हा कचरा रस्त्यावर टाकला.