'... तर भोगावे लागतील गंभीर परिणाम'
फडणवीस यांनी दिली भाजपच्या मंत्र्यांना तंबी
मुंबई: प्रतिनिधी
मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडताना भान ठेवून वागणे आणि बोलणे आवश्यक आहे. अयोग्य वागण्या बोलण्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना दिला आहे.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार असलेला वाल्मीक कराड याच्यामुळे धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून दूर होणे भाग पडले. मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर फडणवीस यांनी तातडीने भाजपच्या मंत्र्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत त्यांनी आपल्या मंत्र्यांना सामाजिक जीवनातील वर्तनाचे धडे देतानाच 'चुकीला माफी' नसल्याची तंबीही दिली.
आपण जनतेचे मंत्री आहात. सरकारसाठी लोकहिताच्या योजना आणि उपक्रम सुचवा. लोकांशी बोलताना भाषा आणि वर्तन योग्य ठेवा. मोबाईलवरून इतरांशी बोलताना तारतम्य ठेवा. पक्षाचे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवा. आपल्या वर्तन आणि वक्तव्यात कोणतीही चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्षाच्या मंत्र्यांना दिला.
Comment List