'पुरातन मंदिराचे जतन हे महत्त्वाचे कार्य''
डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य यांचे प्रतिपादन
पुणे: प्रतिनिधी
केवळ आर्थिक प्राप्तीसाठी नवनवी मंदिरे उभारण्यापेक्षा मोठी परंपरा असलेल्या जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून त्यांची देखभाल आणि व्यवस्थापन करणे, हे मोठे कार्य असल्याचे प्रतिपादन मन्मथधाम संस्थान, कपिलधार येथील सद्गुरु डॉ विरुपाक्ष शिवाचार्य यांनी केले.
डॉ. शिवाचार्य यांच्या समवेत सतसमाज सत्मार्गी आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंडलेश्वर श्री श्री १००८ रामनगिरी गुरु मौनगिरी जी महाराज, श्री क्षेत्र मुखेड येथील ष ब्र १०८ विरूपाक्ष शिवाचार्य व महंत १०८ श्री जनेश्वरानंद गिरीजी महाराज या विभूतींच्या हस्ते राजा केळकर संग्रहालयासमोर असलेल्या उमामहेश्वर मंदिराच्या कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
उत्तर पेशवाईच्या काळात सण 1817 मध्ये सरदार गणपतराव नातू यांनी हे मंदिर बांधले. कालांतराने त्यांच्या वंशज लीना आळेकर यांनी नियमित देखभाल आणि व्यवस्थेसाठी हे मंदिर बक्षीसपत्राने हिंदुस्थान जागरण या विश्वस्त संस्थेकडे सुपूर्द केले. या संस्थेने मंदिराचा जीर्णोद्धार केला असून या संस्थेने कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
निव्वळ आर्थिक लाभासाठी नवनवीन मंदिरे उभारण्यापेक्षा जुनी परंपरा असलेली मंदिरे जतन करणे हे मोठे काम आहे. त्यादृष्टीने हिंदुस्तान जागरण संस्थेने उमा महेश्वर देवस्थानाचा जीर्णोद्धार व व्यवस्थापन हे कार्य उल्लेखनीय आहे, अशा शब्दात डॉ. शिवाचार्य यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक केले. तसेच सध्याच्या काळात मंदिराची उभारणी हा एक व्यवसाय बंनला आहे. मंदिराचे व्यावसायिकरण ही समाजातील मोठी शोकांतिका असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली.
परनिंदा, इतरांचा द्वेष करण्यापेक्षा शुद्ध अंत:करणाने स्वतःची प्रगती साधावी आणि त्याचबरोबर समाज आणि देशाला विकसित करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन शिवाचार्य यांनी उपस्थित भाविक वर्गाला केले.
या कार्यक्रमाला उपस्थित अन्य महंतगणांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. मंदिर उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्वांचा संस्थेचे अध्यक्ष विनायक थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. राजेंद्र वालेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. संस्थेचे कार्यवाहक कैलास सोनटक्के यांनी आभार मानले.
Comment List