'तालकटोरा मैदानात उभारावे मराठा वीरांचे पुतळे'
शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
एकेकाळी दिल्लीचे तख्त राखणारे पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकर या मराठा वीरांचे पुतळे राजधानी दिल्लीतील तालकटोरा मैदानावर उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
पवार यांनी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल पवार यांनी मोदी यांचे आभार मानले आहेत. उद्घाटन समारंभात आपण केलेल्या उद्बोधक आणि प्रभावी भाषणामुळे जगभरातील मराठी माणूस समाधानी असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. शरद पवार हे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते.
हे संमेलन ज्या ठिकाणी पार पडले त्यात तालकटोरा मैदानावर पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे, मल्हारराव होळकर या वीरांचे अर्धाकृती पुतळे उभारले जावे, अशी विनंती या संमेलनाचे आयोजन करणाऱ्या सरहद या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे तर काही साहित्यिकांनी या तिघांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारले जावे अशी मागणी केली आहे. आपल्या कार्यकाळात भारताच्या जाज्वल्य इतिहास आणि परंपरांचे जतन आणि संवर्धन केले जाते. त्यामुळे या तिघा वीरांच्या पुतळ्याच्या उभारणीसाठी आपण संबंधितांना सूचना कराव्या, अशी विनंती पवार यांनी पंतप्रधानांना पत्राद्वारे केली आहे.
Comment List