'चीनपासून भारताला सतर्क राहण्याची गरज'
ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा देतानाच शरद पवार यांनी दिला इशारा
मुंबई: प्रतिनिधी
भारताने पाकिस्तानतील दहशतवादी अड्ड्यांवर केलेले हल्ले योग्यच आहेत. आम्ही यामध्ये कोणतेही राजकारण नाही आणता सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही देतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी भारताने चीनपासून सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली आहे.
अमेरिका, जपान यांच्यासह अनेक देशांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे समर्थन केले आहे. चीनने मात्र भारताला पाठिंबा दिलेला नाही. पाकिस्तानला कदाचित कल्पना नसेल पण भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांची लष्करी क्षमता जाणून आहेत. भारताने चीनपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असे शरद पवार म्हणाले.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील स्थानिक जनता ही उर्वरित भारतातील जनतेबरोबर राहिली, हे वैशिष्ट्य म्हणावे लागेल, असेही पवार म्हणाले. काश्मीरच्या विधानसभेत दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात ठराव झाला. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ठामपणे दहशतवादाला विरोध व्यक्त केला. पाकिस्तानची आर्थिक कोंडी करण्याचे भारत सरकारचे धोरण योग्यच आहे. पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या विरोधात भारताने उघडलेल्या मोहिमेला देण्यात आलेले नाव देखील सूचक आणि योग्य आहे, असेही पवार म्हणाले.