'सभागृहात आपल्याला बोलू दिले जात नाही'
लोकसभा अध्यक्षांनी फटकारल्यानंतर राहुल गांधी यांचा दावा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
सभागृहात नेमके काय सुरू आहे तेच समजत नाही. सभागृहात मला बोलू दिले जात नाही. लोकसभा अध्यक्षांनी माझ्याबद्दल काहीतरी अनावश्यक टिप्पणी केली आणि त्यानंतर काहीच कारण नसताना सभागृहाच्या कामकाजाला स्थगिती दिली, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना संसदेच्या प्रथा आणि परंपरा याचे पालन करण्याची तंबी दिली. आपल्याकडून सभागृहाच्या मर्यादा आणि शालिनीता याच्या उच्च मानदंडांचे पालन व्हावे अशी अपेक्षा आहे. काही अशा घटना माझ्या निदर्शनास आल्या आहेत की संसद सदस्यांकडून सभागृहाचे नियम आणि परंपरा यानुसार वर्तणूक केली जात नाही. या सभागृहात वडील मुलगी, आई मुलगा, पती-पत्नी असे अनेक सदस्य आहेत. किमान लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्यांकडून तरी नियम 349 अनुसार वर्तन केले जावे, अशी अपेक्षा आहे, असे बिर्ला म्हणाले. मात्र, या विधानाचे नक्की कारण समजू शकले नाही. काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या या विधानाला आक्षेप घेतला. यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज स्थगित केले.
त्यानंतर संसदेबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. लोकशाहीत विरोधी पक्षाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. लोकशाहीतील ती एक परंपरा देखील आहे. मात्र, तिचे पालन केले जात नाही. मी जेव्हा बोलायला उठतो तेव्हा मला थोपवले जाते. बोलू दिले जात नाही.
महाकुंभ ही भारताची मोठी परंपरा आहे. सांस्कृतिक उत्सव आहे. इतिहासाचा महत्वाचा भाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर बोलले. मलाही त्याबद्दल बोलायचे होते. त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे बेरोजगारी. लाखो युवक बेरोजगारीचा सामना करीत आहेत. त्यांना काम हवे आहे. रोजगार हवा आहे. याबद्दलही पंतप्रधानांनी बोलायला हवे, अशी अपेक्षा होती. मात्र, ते बोलले नाहीत. मला या संस्थेबद्दल बोलायचे होते पण बोलू दिले नाही, अशी खंत गांधी यांनी व्यक्त केली. लोकशाहीत विरोधकांनाही काही स्थान असते. मात्र, इथे आम्हाला बोलूच दिले जात नाही, असे गांधी म्हणाले.