आयपीएल सामन्यात ना चियर लीडर्स, ना संगीत, ना फटाके
दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ खेळाडू दंडाला बांधणार काळी पट्टी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या सामन्यामध्ये चिअर लीडर्स असणार नाहीत. कोणत्याही प्रकारचे संगीत वाजवले जाणार नाही. त्याचप्रमाणे फटाक्यांची आतिषबजी देखील केली जाणार नाही. दोन्ही संघांचे खेळाडू दंडाला काळ्या फिती बांधून मैदानात उतरणार आहेत. या हल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मिनिटांचे मौन देखील पाळण्यात येणार आहे.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद क्रीडा क्षेत्रात देखील उमटले आहेत. सचिन तेंडुलकर, गौतम गंभीर, विराट कोहली यांच्यासह अनेक क्रिकेट खेळाडूंनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. भारताच्या 19 वर्षाखालील संघात खेळलेल्या एका माजी क्रिकेटपटूने तर यापुढे कधीही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळू नये, अशी मागणी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आयपीएल सामन्यातही या हल्ल्याचा निषेध करण्याचा निर्णय सामना प्रशासनाने घेतला आहे. दक्षिण काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 28 पर्यटक ठार झाले तर 20 हून अधिक जण जखमी आहेत. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत आहे. दि रेजिस्टन्स फ्रंट या लष्करे तय्यबाचा भाग असलेल्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.