ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीत महत्त्वाचे पुरावे नष्ट
चौकशीत अडथळे निर्माण होण्याची शक्यता
मुंबई: प्रतिनिधी
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौथ्या मजल्यावरील कार्यालयाला आग लागल्याने अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची कागदपत्रे आणि पुरावे नष्ट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, त्याचवेळी बहुतेक कागदपत्र आणि पुरावे डिजिटल स्वरूपात रूपांतरित करण्यात आले असल्यामुळे फारसे नुकसान होणार नसल्याचे दावे देखील केले जात आहेत.
ईडीच्या कार्यालयाला रविवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. ही आग तब्बल दहा तास धुमसतच होती. बृहन्मुंबई महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दहा गाड्या आणि शंभर जवान यांच्या अथक प्रयत्नानंतर रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली.
सध्याच्या काळात अनेक मोठ्या प्रकरणांच्या चौकशा ईडीमार्फत केल्या जात आहेत. सध्याचे राजकारण देखील ईडी चौकशांच्या भोवती फिरत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यालयाला लागलेल्या आगीमध्ये निरव मोदी, मेहुल चोक्सी यांचे 14 हजार कोटींचे पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरण, छगन भुजबळ यांचे महाराष्ट्र सदन प्रकरण याचे पुरावे आधीच्या भक्षस्थानी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे.