'आम्ही पोसत होतो दहशतवादी, मात्र तो भूतकाळ आहे'
ख्वाजा आसिफ यांच्यापाठोपाठ बिलावल भुट्टो यांनी देखील दिली कबुली
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
होय, अमेरिकेतील दहशतवादी पोसत होतो. हे उघड गुपित आहे. मात्र त्या चुकी पासून आम्ही मोठा धडा घेतला आहे. आता दहशतवादी संघटनांशी आमचा काहीही संबंध नाही. पाकिस्तान आणि दहशतवादी संघटना यांच्यातले सख्य हा भूतकाळ झाला आहे, अशा शब्दात पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी पाकिस्तान आणि दहशतवादी संबंधांची कबुली दिली आहे. यापूर्वी पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी देखील ही बाब मान्य केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल यांनी, पाकिस्तानने दहशतवाद्यांचे पालन पोषण केले, याची कबुली देतानाच, त्याची फळे आम्हाला भोगावी लागली. त्यापासून शहाणपण शिकून आम्ही काही अंतर्गत बदल केले आहेत. त्यानुसार आता पाकिस्तान दहशतवाद्यांपासून दूर आहे, असा दावाही केला.
काही काळापूर्वी ख्वाजा आसिफ यांनी तीन दशके पाकिस्तानने अमेरिका आणि पाश्चिमात्य देश यांच्यासाठी दहशतवादी घडवण्याचे काम केले आहे, असे जाहीरपणे मान्य केले. सोविएत युद्ध आणि ९/११ चा हल्ला या घटना घडल्यानंतर झालेल्या युद्धांमध्ये आम्ही सहभागी झालो, ही आमची चूक होती. त्या चुकीची फळे आम्हाला भोगावे लागत आहेत. पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्या संबंधात केले जाणारे आरोप हे त्याचेच फळ आहे, असे ख्वाजा आसिफ यांनी मान्य केले आहे. बिलावल यांनी त्यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे.
दहशतवाद्यांना पोसणारा देश, हीच पाकिस्तानची जगभरातील प्रतिमा आहे. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतवादी यांच्याबाबतच्या चर्चेने पुन्हा एकदा जोर धरला आहे. त्यातच पाकिस्तानच्या राजकारणातील ख्वाजा आसिफ आणि बिलावल भुट्टो झरदरी या वजनदार नेत्यांनी याबाबत कबुली देऊन टाकली आहे.