'स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभागांची पुनर्रचना करा'
राज्य निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई: प्रतिनिधी
करोना काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. त्यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत यातील प्रभाग आणि जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील गट आणि गण यांची पुनर्रचना करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ रखडलेले आहेत. काही नैसर्गिक आपत्तीमुळे तर काही वेळा राजकीय अनुकूलता नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर लोकनियक्त प्रतिनिधींचे नव्हे तर प्रशासकांचे नियंत्रण राहिले. ही बाब लोकशाहीसाठी पोषक नसल्याचे लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने या रखडलेल्या निवडणुका चार महिन्यात पार पाडण्याचे आदेश सहा मे रोजी दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. त्या दृष्टीनेच सरकारने प्रभाग, गट आणि गण यांची पुनर्रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेल्या महापालिका आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच पार पडणार, हे आता स्पष्ट झाले आहे.