'पहलगाम हल्ला ही सरकार आणि पर्यटकांची चूक'
हेरगिरी प्रकरणी जेरबंद असलेल्या ज्योती मल्होत्रा हिची मल्लिनाथी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
पहलगाम येथे करण्यात आलेला दहशतवादी हल्ला ही दहशतवाद्यांची नव्हे तर सरकारची आणि पर्यटकांची चूक होती, अशी मल्लिनाथी पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याचा आरोप असलेली युट्युबर ज्योती मल्होत्रा हिने केली आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू असताना ज्योतीने दहशतवादी हल्ल्याचे खापर पर्यटक आणि जम्मू काश्मीर सरकारवर फोडले आहे. आपण जेव्हा कोणत्याही ठिकाणी भ्रमंतीसाठी जातो त्यावेळी सदैव सतर्क राहणे गरजेचे आहे. ही सतर्कता पहलगाम येथे गेलेल्या पर्यटकांनी दाखविली नाही. त्याचप्रमाणे पर्यटकांची गर्दी होत असलेल्या ठिकाणी बंदोबस्त ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारने ही जबाबदारी पार पाडली नाही, अशी टीका ज्योती हिने केली.
आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रसिद्ध केलेले व्हिडिओ हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. आपण काही वेळा पाकिस्तानी लोकांबद्दल व्यक्त केलेल्या सकारात्मक भावना हा आपला व्यक्तिगत विचार आहे, असे ज्योतीने चौकशी दरम्यान सांगितले.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने अंतर्गत सफाईची मोहीम हाती घेतली असून त्या अंतर्गत दहशतवादी आणि हेरगिरी करणाऱ्यांच्या भोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. याच मोहिमेंतर्गत ज्योती मल्होत्रा युट्युबरला तिच्या चार साथीदारांसह अटक करण्यात आली आहे. ज्योतीचा ट्रॅव्हल विथ जो नावाचा यूट्यूब चॅनल आहे. त्याचे तीन लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. या माध्यमातून ज्योतीने पाकिस्तानचे महिमा संवर्धन केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्याचप्रमाणे ज्योतीने भारतातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोपही तिच्यावर आहे.
पाकिस्तान भेटीच्या वेळी व्हिसा मिळवण्यासाठी पाकिस्तानच्या उच्चालयात गेली असता तिची ओळख दानिश नामक व्यक्तीशी झाली. दानिश याच्या माध्यमातून ज्योतीचा पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या काळात देखील ज्योती आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा संपर्क होता, असा आरोपही ज्योतीवर आहे.