- देश-विदेश
- पाकिस्तानातील मुहाजिरांना भारताकडून मदतीची अपेक्षा
पाकिस्तानातील मुहाजिरांना भारताकडून मदतीची अपेक्षा
पाक सरकार आणि लष्कराकडून दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
फाळणीच्या वेळी भारतातून पाकिस्तानात गेलेल्या लोकांना मुहाजिर म्हटले जाते. या लोकांना पाकिस्तान सरकार आणि लष्कराकडून दुय्यम वागणूक मिळत असून त्याच्या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाकडे आवाज उठवावा, अशी अपेक्षा मुहाजीरांचे नेते आणि मुत्ताहिद कौमी मूव्हमेंटचे संस्थापक अल्ताफ हुसेन यांनी व्यक्त केली आहे.
फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या मुहाजिरांना अनेक दशकांपासून छळले जात आहे. खुद्द पाकिस्तान सरकार आणि लष्करच त्यांचा छळ करत आहे. अनेक दशकांपासून आम्हाला दुय्यम वागणूक मिळत आहे. सरकार आणि लष्कराने केव्हाही आम्हाला वैध नागरिकाचा दर्जा दिलेला नाही. पाकिस्तानी सैन्याकडून आतापर्यंत तब्बल 25 हजार मुहाजरांचा बळी घेतला गेला आहे. तसेच हजारोंना गायब करण्यात आले आहे, अशी कैफियत अल्ताफ हुसेन यांनी लंडनमध्ये व्यक्त केली.
स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्या आणि त्यासाठी अनेक दशके लढा देणाऱ्या बलुच लोकांना भारत पाठिंबा देत असल्याबद्दल हुसेन यांनी समाधान व्यक्त केले. भारताचे हे पाऊल नैतिकदृष्ट्या योग्य व साहसी आहे. त्यांच्याप्रमाणेच मुहाजिरांच्या समस्येला भारताच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचा फोडावी, असे हुसेन म्हणाले.
ह्यूस्टनमध्ये पाकिस्तानचे मुख्य राजदूत आफताब चौधरी यांनी एका कार्यक्रमात एक व्हिडिओ प्रदर्शित केला. त्या व्हिडिओमध्ये अल्ताफ हुसेन आणि त्यांच्या संघटनेला भारताचा एजंट म्हणून उल्लेख करण्यात आले, असा आरोप हुसेन यांनी केला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने मुहाजिरांच्या अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.