- संपादकीय
- पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!
पैशाच्या लोभासाठी क्रौर्याची परिसिमा!
कुटुंबीयांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि विवाह सोहळ्यात पतीची आणि त्याच्या कुटुंबाची 'बडदास्त' सांभाळत कोट्यवधी रुपयांची मुक्त उधळ दिल्यानंतरही असाह्य जाच सहन करत शेवटी जीवन संपवणाऱ्या 'वैष्णवी'च्या मृत्यूने राज्यभरात हुंडा बळीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. आता खासदार सुप्रिया सुळे या प्रश्नावर पुरोगामी पुण्यात जनजागृती करणार आहेत. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आतापर्यंत २०७ अशा 'वैष्णवींवर जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
By Rahi Bhide
On
स्थित्यंतर / राही भिडे
9867521049
9867521049
आजकाल महिलांच्या विशेषतः तरुण मुलींच्या समस्यांमध्ये अधिकाधिक भर पडत आहे. हुंडाबळींची संख्या वाढत आहे. कायदे कितीही कडक केले तरी कायद्याची भीती उरली नाही. अजूनही हुंड्यासाठी महिलांचा छळ करण्याचा प्रकार थांबत नाही. समाजाचा पोत अमुलाग्र बदलत चालला आहे. पुण्यात वैष्णवी हगवणे या उच्चशिक्षित आणि सुंदर युवतीचा बळी गेला. कितीही संपत्ती असली, तरी हुंड्याचा हव्यास कमी होत नाही. श्रीमंत आणि राजकारणी घरातील व्यक्ती किती खालच्या थराला जातात, हे वैष्णवीच्या उदाहरणातून दिसले.
भारतात विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जातो; परंतु या विवाहसंस्कारालाच तडे जात आहेत. हुंड्याची प्रथा केवळ सामाजिक अन्याय नाही, तर ती स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर घाला घालणारी एक गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. हुंड्याच्या नावाखाली दरवर्षी हजारो महिलांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. ही बाब केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर संपूर्ण समाजासाठी चिंतेचा विषय आहे. वैष्णवीचे सासरे राजकारणात, पती राजकारणात. दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे. वैष्णवीची आत्महत्या झाल्याचे सांगितले जात असले, तरी तिच्या शवविच्छेदन अहवालावरून तिला मारहाण करून गळफास लावला असावा, असे मानायला जागा आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय आणि समाजिक क्षेत्र ढवळून निघालेले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस तपास करत असतानाच रोज नवीन माहिती समोर येत आहे. हुंड्यासाठी वैष्णवी हगवणेचा छळ करणारा सासरा, दीर, पतीबरोबरच सासू आणि नणंदेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे; परंतु वैष्णवीच्या सासरची मंडळी गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि विकृत वृत्तीची आहेत, हे या प्रकरणातून पुढे आले आहे. पोलीस आणि महिला आयोगाने वेळीच दक्षता घेतली असती, तर वैष्णवीचा मृत्यू टाळता आला असता. अशा घटनांत एरव्ही मोर्चे काढणाऱ्या महिला संघटना आणि त्यांच्या नेत्या तसेच राजकारणात कुठल्याही पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या नेत्या, वैष्णवीच्या बाबतीत कुठे गेल्या, त्यांचा आवाज का निघत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. हगवणे कुटुंबाकडून केवळ वैष्णवीलाच नाही, तर थोरला मुलगा सुशीलची पत्नी मयुरीचाही छळ करण्यात आला होता. मयुरीच्या आईने महिला आयोगाला लिहिलेले पत्र वाचले, तर हगवणे कुटुंबीयांची सडलेली मानसिकता लक्षात येते. मयुरीची आई लता जगताप आणि भाऊ मेघराज जगताप यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला लिहिलेल्या पत्राची महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दखल घेतली नाही. असा कार्यकर्त्यांचा आरोप असून कार्यकर्त्यांच्या रोषापुढे त्यांना निरुत्तर व्हावे लागले.
वैष्णवीचा हुंड्यासाठी अमानुष छळ सासरे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी केला आहे. ५१ तोळे सोने, फॉर्च्यूनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली होती, तरी जमीन खरेदीसाठी दोन कोटी रुपयांच्या मागणीचा तगादा लावला होता. वैष्णवीचे वडील आनंद कस्पटे यांनी पती शशांक, सासरे राजेंद्र, सासू लता, दीर सुशील आणि नणंद करिश्मा यांच्या विरोधात हत्येचा आरोप करत बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली; परंतु शवविच्छेदन अहवाल घेऊनही पोलिसांनी फक्त आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अटक करूनही वैष्णवीचा नवरा शशांक याचा मुजोरपणा कमी झालेला नाही. पश्चातापाचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर नव्हता. विकृती इतकी अंगी भिनली आहे, की वैष्णवीच्या दहा महिन्याच्या मुलाच्या अंगावरही व्रण आहेत. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हे बाळ सात दिवस गायब करण्यात आले होते. जिल्हा परिषदेचा सदस्य, विधानसभेच्या निवडणुका लढवून पराभव पत्करलेल्या सासऱ्याने सुनेशी गलिच्छ वर्तन करावे आणि समाजात नाक वर करून वावरावे, यासारखी दुसरी संतापजनक घटना नाही. वैष्णवीच्या आत्महत्येपूर्वी हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचे, शरीरावर व्रण असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याने वैष्णवीचा जीव गेला. अगदी असेच मोठ्या सुनेचाही छळ हगवणे कुटुंबीयांनी केला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती: परंतु हगवणे कुटुंबीयांचे नातेवाईक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी असलेल्या सुपेकर यांच्या दबावामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप आता केला जात आहे. सुपेकर हा आरोप नाकारत असले, तरी पोलिसांनी कारवाई का केली नाही, असा प्रश्न उरतो.
सासरे राजेंद्र यांनी मोठ्या सुनेचे कपडे फाटेपर्यंत मारहाण केली आणि लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. तेव्हा राजकीय दबावापोटी त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तेव्हाच कठोर कारवाई झाली असती तर कदाचित लहान सून वैष्णवीवर हे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ आली नसती. आजकालचे तरुण-तरुणी प्रेमात वाहवत जातात. मुलाची, त्याच्या कुटुंबीयांची नीट चौकशी करीत नाहीत. आपल्या प्रेमाखातर आई-वडिलांचा विरोध डावलून लग्न करणाऱ्या प्रेयसीला कुटुंबात साथ देणे, प्रसंगी आई-वडिलांच्या, बहिणी-भावाच्या विरोधात उभे राहणे ही पतीची जबाबदारी आहे. मुलींनीही सासरी छळ होत असेल, तर तो आई- वडिलांना आणि मैत्रिणींना विश्वासात घेऊन सांगायला हवा. मैत्रिणी, आई- वडिलांनी धीर द्यायला हवा. वैष्णवीची निवड चुकली, म्हणून तिला दोष देण्यापेक्षा तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर तिला घरी आणून तिची जबाबदारी घेतली असती, तर वैष्णवी वाचू शकली असती. कुटुंबीयांचा विरोध पत्कारून प्रेम विवाह करणाऱ्या आणि विवाह सोहळ्यात पतीची आणि त्याच्या कुटुंबाची 'बडदास्त' सांभाळत कोट्यवधी रुपयांची मुक्त उधळ दिल्यानंतरही असाह्य जाच सहन करत शेवटी जीवन संपवणाऱ्या 'वैष्णवी'च्या मृत्यूने राज्यभरात हुंडा बळीविरोधात संतापाची लाट पसरली आहे. आता खासदार सुप्रिया सुळे या प्रश्नावर पुरोगामी पुण्यात जनजागृती करणार आहेत. पती आणि सासरच्या जाचाला कंटाळून पुण्यात आतापर्यंत २०७ अशा 'वैष्णवींवर जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यांच्या टोमण्यांना हुंड्यासाठी, अवाजवी मागण्या आणिघरकामावरून बोलणी खात तब्बल २०७ 'वैष्णवींनी आपले जीवन संपवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आपल्या आजूबाजूला अशा मन विषण्ण करणाऱ्या घटना घडत आहेत, समाजाचे अधःपतन होत असल्याचे पाहावे लागत आहे.
000
Tags: Vaishnavi Hagawane
About The Author

Latest News
30 May 2025 15:45:31
उंब्रज : मे महिन्यात सुमारे दहा दिवस झालेल्या मुसळधार पावसाने उंब्रज विभागातील वीट भट्टी व्यवसायांना मटका फटका बसला असून ९०...