- देश-विदेश
- भारतीय हत्ती घालत आहेत नेपाळमध्ये धुमाकूळ
भारतीय हत्ती घालत आहेत नेपाळमध्ये धुमाकूळ
सीमावर्ती भागातील अतिक्रमणांचा भयानक परिणाम
पटना: वृत्तसंस्था
सीमावर्ती भागातील भारतीय हत्ती नेपाळ मध्ये जाऊन धुमाकूळ घालत आहेत. यामुळे विशेषतः शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत असून या भागात नाकाबंदी करण्याची नागरिकांची मागणी आहे. हत्तींच्या अधिवासात करण्यात आलेल्या अतिक्रमणाचा हा भयानक परिणाम आहे.
भारत आणि नेपाळ यांच्यामध्ये हत्तींची वहिवाट असलेला तनकपुर ब्रह्मदेव हा अनेक दशकांपूर्वीचा मार्ग आहे. मागील काही काळापासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आणि मानवी हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे वहिवाटीसाठी जागा न उरलेले हत्ती मानवी वस्तीकडे मोर्चा वळवू लागले आहेत. कोंडी झालेल्या हत्तींकडून सीमा वरती भागातील घरांमध्ये घुसून तोडफोड केली जाण्याचे प्रकार अनेक गावात घडले आहेत. काही वेळा तर संतप्त हत्तींनी ग्रामस्थांवर हल्ला केल्याचेही दिसून आले आहे.
आता हे हत्ती नेपाळच्या हद्दीत घुसून सीमावर्ती भागातील गव्हाच्या शेतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करू लागले आहेत. त्यामुळे हत्ती सीमा ओलांडत असलेल्या भागांची नाकाबंदी करावी आणि त्यांच्या वहिवाटीचा जुना मार्ग पुन्हा खुला करून देण्यात यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हत्तींपासून पीक वाचविण्यासाठी नेपाळमधील शेतकरी रात्रभर जागून मशाली पेटवून गस्त घालत आहेत.
हत्तींमुळे होणाऱ्या त्रासातून मार्ग काढण्यासाठी भारत आणि नेपाळमधील हत्तींच्या वहिवाटीचा जुना मार्ग खुला करणे, या मार्गावरील अतिक्रमणे हटवणे आणि मानवी हस्तक्षेप कमी करणे, हाच एकमेव मार्ग असल्याचे डेहराडून येथील वन्य प्राण्यांसाठी काम करणाऱ्या डब्ल्यू आय आय या संस्थेतील प्राणी संशोधक हरीश गुलेरिया यांनी स्पष्ट केले. हत्तींच्या वहिवाटीचा मार्ग सुरक्षित राखण्यासाठी आपली संस्था पुढाकार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.