लाहोरमध्ये सकाळीच तीन शक्तिशाली स्फोट
स्फोट घडवून आणला कोणी हे अद्याप अस्पष्ट
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याच्या धक्क्यातून पाकिस्तान बाहेर आलेला नसतानाच आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास लाहोर शहरात तीन शक्तिशाली स्फोट झाले आहेत. हे स्फोट क्षेपणास्त्रचे असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. मात्र, पाकिस्तानी लष्कर, सरकार किंवा पंजाब प्रांताचे सरकार यांच्याकडून आतापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसल्यामुळे या स्फोटांबाबत गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण आहे.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने मंगळवार बुधवारच्या मध्यरात्री एक ते एक वाजून पंचवीस मिनिटं या कालावधीत क्षेपणास्त्र डागून पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मूकाश्मीरमधील नऊ ठिकाणी असलेले 21 दहशतवादी तळ उध्वस्त केले आहेत. या मोहिमेला भारताने ऑपरेशन सिंदूर असे समर्पक नाव दिले आहे.
लाहोर मध्ये झालेले स्फोट नेमके कोणत्या ठिकाणी झाले, ते कोणी घडवून आणले, या स्फोटामुळे किती जीवित व वित्तहानी झाली, याची कोणतीही माहिती अद्याप उपलब्ध नसल्यामुळे त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. हेच स्फोट म्हणजे भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरचा पुढचा भाग आहे की तहरीके तालिबान पाकिस्तान किंवा बलोच लिबरेशन आर्मी यांनी हा स्फोट घडवून आणला असावा, अशा चर्चा सुरू आहेत. खुद्द पाकिस्ताननेच भारताला बदनाम करण्याच्या दृष्टीने हे स्फोट घडवून आणले असावेत, असा तर्कही मांडला जात आहे.