पाकिस्तानप्रमाणेच बीडमध्ये राबवा 'ऑपरेशन सिंदूर'
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची राज्य सरकारकडे मागणी
मुंबई: प्रतिनिधी
सीमेपलीकडील दहशतवाद्यांप्रमाणेच राज्यातील बीड जिल्ह्यात अनेक 'अण्णा आणि आका' यांनी प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण केले असून त्यांच्या विरोधातही 'ऑपरेशन सिंदूर' राबवावे, अशी मागणी समाजसेविका अंजली दमानिया यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांच्या या मागणीला समाज माध्यमांमधून मोठा प्रतिसादही मिळत आहे.
पवनचक्की उभारण्यासाठी खंडणीच्या मागणीवरून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यापासून बीड जिल्हा कायम चर्चेत राहिला आहे. त्यानंतरही जिल्ह्यातील गुंडगिरीची अनेक प्रकरणे उघड झाली. त्याचे व्हिडिओ समाज माध्यमातून प्रसिद्ध झाले आणि त्याचीही राज्यभरात चर्चा झाली. नुकताच एका अल्पवयीन मुलाला अमानुष मारहाण करण्यात आली. यात मारहाण करणारी मुले देखील सतरा अठरा वर्षापर्यंतच्या वयोगटातील होती. त्यावरून या भागात गुंडगिरीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे दिसून येते.
याच प्रकारांची दमानिया यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. बीड जिल्हा, विशेषतः परळी तालुका हा गुंडगिरीचा अड्डा झाला आहे. त्याला अतिशय गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यासाठीच सीमापारच्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केलेल्या कारवाई प्रमाणेच बीडमध्ये देखील गुंडांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे दमानिया यांनी नमूद केले आहे.