अहिल्यादेवींच्या विचारांनुसार महिलांनी वाटचाल करावी - आमदार रामहरी रुपनवर
कराडमध्ये सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांचा पुरस्काराने गौरव
कराड : "अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा जागर आणि प्रचार आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या जीवनकार्याचे अनुकरण करत बहुजन समाजाने नव्या उंचीने वाटचाल केली पाहिजे," असे प्रतिपादन आमदार रामहरी रुपनवर यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनमध्ये अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट आणि ऑल इंडिया धनगर समाज महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये राज्यभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १४६ महिलांना 'आदर्श माता पुरस्कार' व 'अहिल्यारत्न पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा महिला सन्मान सोहळा ठरला. या सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
आमदार रुपनवर म्हणाले, "अहिल्यादेवी या मानवतेच्या, समतेच्या आणि न्याय तत्वांच्या पुरस्कर्ती होत्या. त्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या; तर एक आदर्श समाजसुधारक, धर्मनिरपेक्ष विचारवंत आणि स्त्रियांसाठी प्रेरणास्त्रोत होत्या. त्यांनी देशभरात पाच हजार पेक्षा अधिक मंदिरे बांधली, जीर्णोद्धार केला आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र सैनिकी फलटण स्थापनेचा इतिहास घडवला. त्यांनी २९ वर्षे प्रजाहिताच्या दृष्टीने आदर्श राज्यकारभार केला."
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील स्त्रियांनी योगदान देत असलेल्या कार्याचे जतन व गौरव करण्याच्या उद्देशाने या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष शिक्षक संघ बळवंतराव पाटील, अहिल्यादेवी ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीण काकडे, उद्योगपती बाळासाहेब खरात, तसेच स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सदस्य उत्तमराव गलांडे यांची भाषणे झाली.
यावेळी श्रीमंत योगीराज संजय गायकवाड, अशोकराव शेडगे (माजी नगरसेवक, सातारा), हनुमंतराव दुधाळ (उद्योगपती, पुणे), मोटार वाहन निरीक्षक सौरभ दडस, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष, आबासाहेब गावडे, कराडचे माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, म्हाडा अधिकारी, मुंबई शंकरराव वीरकर, कराड मार्केट कमिटीचे उपसभापती संभाजी काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण काकडे यांनी केले. तर एम. डी. दडस यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. दिलीप बरकडे, प्रा. शितल काकडे, सतिश थोरात, आनंदराव कचरे, रामचंद्र पुकळे, तुकाराम कोकरे, बाबुराव शेडगे, अंकूश मोरे, दत्ता खरात, विष्णू हुलवान, बाबासो काकडे, कैलास काकडे, मृणाल दडस, नारायण कोकरे, अजित ताटे, इंद्रजित ताटे, सुजीत गलांडे, अर्जुन चव्हाण आदींनी मेहनत घेतली.
00000000000000