वाईतील दिमाखदार सोहळ्यात ‘सहजीवनातील आनंद’ पुस्तकाचे प्रकाशन
अभूतपूर्व विक्रमी गर्दीचा उच्चांक : आनंद कोल्हापुरे यांची पुण्याई सिद्ध
वाई : भल्या मोठ्या सभागृहासह चोहूबाजूंनी झालेली अभूतपुर्व गर्दी, कार्यक्रमस्थळी स्व. आनंद कोल्हापुरे यांच्या आठवणींचा उमठलेला गहिवर, ज्येष्ठ नेते स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या पत्नी सुमनकाकी पाटील यांची प्रथमच या जाहीर कार्यक्रमात उपस्थिती, सर्वच ख्यातनाम मान्यवरांची कार्यक्रमास विशिष्ट उंचीवर नेणारी मनोगते आणि संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत देखणे आणि नेटके नियोजन अशा दिमाखदार सोहळ्यात अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी लिहिलेल्या ‘सहजीवनातील आनंद’ या पुस्तकाचे शानदार प्रकाशन वाई येथील सत्यवती जोशी सभागृहात संपन्न झाले.
वाईचे माजी उपनगराध्यक्ष, रोटरीचे माजी अध्यक्ष, वाई जिमखाना, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेसह विविध संस्थांचे संस्थापक, पदाधिकारी, वाईतील विविध सामाजिक, सहकार, शैक्षणिक, आरोग्य आणि विविध संस्थात्मक कामात उपक्रमशिलपणे कार्यरत राहिलेले शिवछत्रपती युवा पुरस्कारप्राप्त, वाई भूषण स्व. आनंद कोल्हापुरे तथा अण्णा यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणारे ‘सहजीवनातील आनंद’ या त्यांच्या सहचारिणी तथा उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा अनुराधा आनंद कोल्हापुरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सुमनकाकी लक्ष्मणराव पाटील, ज्येष्ठ व्याख्याते, लेखक डॉ. यशवंत पाटणे, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, प्रसिद्ध लेखिका तथा माजी सनदी अधिकारी विद्या पोळ जगताप, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे, उत्कर्षचे उपाध्यक्ष अॅड. रमेश यादव यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत वाई येथील सत्यवती जोशी सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमास झालेल्या अभुतपूर्व गर्दीने पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यातील गर्दीचा उच्चांक प्रस्थापित करतानाच स्व. आनंद कोल्हापुरे यांची पुण्याई देखील सिद्ध केली.
स्व. आनंद कोल्हापुरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ आनंद कोल्हापुरे यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, मृत्यू हा अटळ असला तरी अक्षरे ही चिरंतन आहेत. अनुराधा कोल्हापुरे यांनी लिहिलेल्या पुस्तकातून आनंद कोल्हापुरे यांना चिरंजिव केले आहे. हे पुस्तक जेवढे देखणे आहे तेवढेच ते सर्वांसाठी आदर्श, प्रेरणा देणारे आहे. अनुराधा कोल्हापुरे यांनी काळजातून कोरलेले हे शब्दशिल्प एक दस्तऐवज असून तो प्रत्येकाने वाचला पाहिजे.
विद्या पोळ जगताप म्हणाल्या, आनंद कोल्हापुरे यांना आपल्यातून जाऊन नऊ वर्षे झाली. मात्र त्यांच्या प्रेमाची ज्योत अनुराधा कोल्हापुरे यांनी आपल्या हृदयात कशी कायम तेवत ठेवली आहे याचे दर्शन या पुस्तकातून होते. नऊ वर्षांनंतरही या सोहळ्यात त्यांना त्यांचे अश्रू आवरणे कठीण झाले. त्यावेळी त्यांना सावरताना माझ्या लक्षात आले, की एक आदर्श सहजीवन त्यांनी अनुभवले आहे आणि ते या पुस्तकारच्या माध्यमातून सर्वांना सादर झाले आहे.
विनोद कुलकर्णी म्हणाले, सहकार क्षेत्रात काम करत असताना अण्णांशी परिचय झाला. एक उमदं आणि सहकाराविषयी आस्था, तळमळ असणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंद कोल्हापुरे. त्यांच्या पश्चात त्यांचे कार्य पुढे नेताना अनुराधा कोल्हापुरे यांनी लढलेली लढाई झाशीच्या राणीची तडफ दाखवणारी आहे. त्या तडफेतून अण्णांचे कार्य पुढे नेताना ते उंचावण्याचे काम त्यांनी केले आहे. अण्णांच्या आपल्याला माहिती नसलेल्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख हे पुस्तक करुन देतं.
प्रास्ताविकात बोलताना अनुराधा कोल्हापुरे म्हणाल्या, गेली नऊ वर्ष हे पुस्तक लिहित आहे. लिहायला सुरुवात करताच प्रत्येकवेळी डोळे भरुन यायचे. अखेर अहोंनीच दिलेली खंबीरपणाची प्रेरणा अंगी बानवून हे पुस्तक पूर्ण केले. त्यांच्या आठवणींच्या फुलांची ओंजळ भरत ती वाचकांपर्यंत पोहोचवताना काट्यांची वाट चालावी लागली. अशा तपश्चर्येतून हे पुस्तक पूर्ण झाले आहे. समुद्रातील एक ओंजळभर पाण्याएवढ्याच आठवणी या पुस्तकात असून या कृतीतून कर्तव्य पार पाडले आहे.
यावेळी सुनील शिंदे, राजेश शेलार, नितिराज बाबर यांनीही मनोगत व्यक्त केले. उत्कर्षच्या पदाधिकार्यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. रंगता बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अमर कोल्हापुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.
कोल्हापुरेंशी असणार्या जिव्हाळ्यापोटी सुमनकाकी पाटील प्रथमच जाहीर कार्यक्रमात उपस्थित
ज्येष्ठ नेते स्व. लक्ष्मणराव पाटील सातारा जिल्ह्याचे पोलादी पुरुष म्हणून ओळखले जायचे. त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेक मोठी पदे भूषवली. मात्र, तात्यांच्या पत्नी आणि उद्योजक मिलिंद पाटील, महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील यांच्या मातोश्री सुमनकाकी पाटील या कधीच जाहीर कार्यक्रमात कुठल्या व्यासपिठावर मिरवल्या नाहीत. अत्यंत साधी राहणी व घरी आलेल्या प्रत्येकाचा पाहुणचार करीत त्यांनी लक्ष्मणराव पाटील यांचा संसार यशस्वी केला. एकत्रित कुटुंबाचा आदर्श निर्माण करीत सर्व मुलांना कर्तबगार करुन आदर्श माता म्हणून स्वत:ला सिद्ध केले. अशा सुमनकाकी पहिल्यांदाच या सोहळ्यात व्यासपिठावर आल्या. याचे सर्वांनाच कुतूहल निर्माण झाले होते. सुमनकाकी पाटील यांनी सांगितले, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे कारण हे कोल्हापुरे यांच्याशी असणारा कौटुंबिक स्नेह आहे. आनंद कोल्हापुरे म्हणजे आमचा नंदू अतिशय गुणाचा पोर होता. कोल्हापुरे आणि आम्ही सुमारे पन्नास वर्षांपूर्वी वाईमध्ये एकाच वाड्यात राहत होतो. नंदूच्या आई इंदुमती याही अकाली गेल्या. नंदुचे जाणेही वेदना देणारे होते. अनुराधाने नंदुच्या आठवणींवर पुस्तक लिहिले याचे समाधान वाटले म्हणून या प्रथमच अशा कार्यक्रमात आले. सुमनकाकी प्रथमच अशा जाहीर कार्यक्रमात आल्याने कार्यक्रमानंतर त्यांना भेटण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती.
000