कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा

कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा

अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांचे रस्ते विकास महामंडळ आणि मेगा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला आदेश, जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक

 

कोरेगांव : सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर कोरेगाव शहराच्या प्रवेशद्वारावर वसना नदी पात्रावर ब्रिटिश कालीन पुलाच्या जागी नवीन उंच पूल उभारावा. या पुलाचे काम तातडीने सुरू करावे. शहरातील रखडलेली कामे तात्काळ मार्गी लावावीत, असे स्पष्ट निर्देश अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांनी दिले.

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांच्या अध्यक्षतेखाली महामार्गाच्या प्रलंबित कामाविषयी महत्वपूर्ण बैठक झाली. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहूल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्षा दिपाली महेश बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिनभैय्या बर्गे, नितीन उर्फ बच्चूशेठ ओसवाल, नगरसेवक सागर विरकर, संतोष नलावडे, प्रदीप बोतालजी यांच्यासह विकास आघाडीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

हे पण वाचा  म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'

निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी बैठकीच्या आयोजनामागील भूमिका विषद करत कोरेगावकर नागरिकांच्या भावना या तीव्र झाल्या असून नगराध्यक्षांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली असल्याचे स्पष्ट केले.

रस्ते विकास महामंडळाच्या महिला कार्यकारी अभियंता यांनी मेघा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या ठेकेदार कंपनीच्या दिरंगाईमुळे सदरची कामे रखडली असल्याचे सांगितले. या कंपनीकडून काम काढून घ्यावे, यासाठी प्रस्ताव मंत्रालयात सादर केला असल्याचेही सांगितले. २०१३ साली सदरचे काम मंजूर झाले असून त्यावेळी या कामांना जिओ टॅगिंगची सुविधा नव्हती त्यामुळे प्रत्यक्षात किती काम झाले आणि किती अपूर्ण आहे, याबाबत माहिती देता येणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

ठेकेदार कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजर यांनी केवळ वेळकाढूपणा करत येत्या पंधरा दिवसात काम सुरू करत असल्याचे सांगितले. राहूल प्रकाश बर्गे यांनी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनीने चुकीची माहिती प्रशासनाला देऊ नये, असे स्पष्ट करत प्रशासनाने वस्तुस्थिती पहावी आणि मगच निर्णय घ्यावा, अशी विनंती केली.

कोरेगाव शहर किंवा तालुक्यापुरते पुरता हा महामार्ग महत्त्वाचा नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांना जोडणारा महत्वपूर्ण रस्ता आहे. परिसरात ऊस क्षेत्र जास्त असून सुमारे १२ ते १५ साखर कारखान्यांची ऊस वाहतूक या महामार्गावरुन होते, असे निदर्शनास आणून दिले. कोरेगाव रेल्वे स्टेशन नजीक शहराच्या प्रवेशद्वारावर ब्रिटिशकालीन पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारण्याची मागणी आमदार महेश शिंदे यांनी यापूर्वीच केली आहे. सध्याच्या ठिकाणी दुसरा पूल उभारला तरी तो कमी उंचीचा होणार असून कारखान्याच्या गळीत हंगामामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात होत आहेत. पर्यायाने वाहतूक कोंडी होते, असे निदर्शनास आणून दिले. 0.75 मीटरने पुलाची उंची वाढवून काहीही होणार नाही, नव्याने डिझाईन तयार करून पुलाची उंची रेल्वेच्या पुलाएवढी करणे आवश्यक आहे. त्यातून महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लागणार असल्याचे राहुल प्रकाश बर्गे यांनी उदाहरणासह पटवून दिले. शहरातील साखळी पुलाच्या ठिकाणी नवीन उंच पूल उभारणी आवश्यक असल्याचेही बर्गे यांनी निदर्शनास आणून दिले. जुन्या रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ठेकेदार कंपनीने कापली असून नव्याने झाडे लावलेली नाहीत, असा मुद्दा राहुल बर्गे यांनी उपस्थित केला त्यावर कार्यकारी अभियंता यांनी ठेकेदार कंपनीने झाडे लावली होती मात्र लगेच शेतकरी काढून टाकतात असा अहवाल ठेकेदार कंपनीने दिला असल्याचे सांगितले त्यावर संतप्त झालेल्या राहुल बर्गे यांनी जर झाडे लावलीच नाहीत तर शेतकरी काढतील कसे आपण खोटे सांगू नका झाडे लावली नाहीत तर नाहीत असे स्पष्ट करा अशी मागणी केली. त्यावर कार्यकारी अभियंता निरुत्तर झाल्या. महेश बर्गे यांनी झाडाबाबत प्रश्न उपस्थित करून जियो टॅगिंगचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर टेंडर मध्ये हा मुद्दाच नसल्याचे कार्यकारी अभियंता यांनी सांगताच महेश बर्गे यांनी २०१३ साली टेंडर काढले, तेव्हा सुद्धा जिओ टॅगिंग होते असे निदर्शनास आणून दिले. एकूणच रस्ते विकास महामंडळ आजच्या बैठकीत आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट झाले.

महेश बर्गे यांनी ठेकेदार कंपनीने पोट ठेकेदार नेमल्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असल्याचा आरोप केला. ठेकेदार कंपनीमुळे अनेक अपघात झाले असून काही जणांचा मृत्यू झाला आहे. या संदर्भात कोरेगाव पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत तरी देखील ठेकेदार कंपनी जुमानत नसेल तर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारावा, अशी विनंती केली.

कार्यकारी अभियंता यांनी माझी नियुक्ती होण्यापूर्वीचे काम आहे. आमच्या हातात जेवढे आहे, तेवढे मी करत आहे. माझे रिपोर्टिंग करण्याचे काम आहे. मंत्रालयात याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. लवकरच याबाबत वरिष्ठ स्तरावर महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यानंतर ठेकेदार कंपनीकडून काम काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे सांगितले त्यावर राहूल प्रकाश बर्गे, महेश साहेबराव बर्गे आणि सुनीलदादा बर्गे यांनी केवळ काम काढून घेतले तर कोरेगावकरांवर पुन्हा एकदा अन्याय होणार आहे. सदर ठेकेदार कंपनी ब्लॅकलिस्टेड करावी आणि त्यांच्या दंडात्मक कारवाई करून चालणार नाही तर त्यांच्या थेट कारवाई करावी, अशी मागणी केली.

अपर जिल्हाधिकारी मलिकार्जुन माने यांनी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी विनोद जळक यांना तातडीने शहरातील कामांचा आढावा घेऊन कामे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर रस्ते विकास महामंडळाला ठेकेदार कंपनी बाबतचे निर्णय प्रक्रिया लवकर राबविण्याचेही आदेश दिले.

 

आमदार महेश शिंदे घेणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट : प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांची माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत झालेल्या चर्चेची आणि निर्णयाची माहिती कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी पत्रकारांना दिली. आमदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव नगरपंचायतीने पत्रव्यवहार करून जिल्हा प्रशासनाला रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी करत असलेल्या दुर्लक्षाबाबत माहिती दिली होती. जिल्हा प्रशासनाने आज बैठक घेऊन चर्चा केली आहे, मात्र त्यातून फलनिष्पत्ती बऱ्यापैकी झाली असली तरी रस्ते विकास महामंडळ आणि ठेकेदार कंपनी अपेक्षित काम गतीने पूर्ण करू शकत नाही, हे आमच्या लक्षात आले आहे. आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास या बाबी आणून दिल्या असून केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोरेगाव शहरातील रेल्वे स्टेशन नजीकच्या पुलाची उंची वाढविण्याबाबत ते मागणी करणार असल्याचेही बर्गे यांनी स्पष्ट केले.

Tags:

Advertisement

Latest News

कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा कोरेगाव-वाठार रस्ता झाला खड्ड्याचा
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हे समजेना कोरेगाव : खंडाळा ते शिरोळ या सुमारे 140 किलोमीटर रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू...
तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत परप्रांतीय वाढले
साताऱ्यात शिवसेनेच्या वतीने विमान अपघातग्रस्तांना भावपूर्ण श्रद्धांजली
म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'
रायसोनी कॉलेजच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागालाएनबीए मान्यता!
शास्त्रीय संगीत-नृत्य, गायनाने सजला 'गंगाधर स्वरोत्सव युव-रंग'
३० जूनपर्यंत मालमत्ता कर भरून सवलतींचा लाभ घेण्याचे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

Advt