बीड बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी

बीड बंदच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

बीड: प्रतिनिधी 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड याला पाठीशी घालण्याचा आरोप होत असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामेच्या मागणीवर आंदोलक ठाम आहेत. 

खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी देशमुख यांना मारहाण आणि हत्या करताना त्याचे छायाचित्रण केले. ते समाजमाध्यमातून प्रसिद्ध झाले आणि केवळ बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर संतापाची लाट उसळली. 

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांना मंत्रीपदावरून दूर करावे, अशी मागणी विरोधकांबरोबरच मुंडे यांच्या मित्र पक्षातील आणि स्वपक्षातील आमदार, खासदार, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकही करू लागले आहेत. मात्र, आजपर्यंत त्यांच्या राजीनामेबाबत नेत्यांकडून टोलवाटोलवी केली जात आहे. 

देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ बीड जिल्ह्यात कडकडीत बंद पाळला जात आहे. बीड शहरात सकाळपासूनच गजबजणाऱ्या बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. शहर व जिल्ह्यातील नागरिक उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून कलंकित मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून राज्यकर्त्यांना घेरण्याची रणनीती विरोधकांनी पहिल्याच दिवशी स्पष्ट केली आहे. अधिवेशनाच्या काळात मुंडे यांच्या राजीनाम्यची मागणी अधिक जोर धरण्याची चिन्ह आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांचा यापूर्वीच राजीनामा घेतला असून त्याबाबत दोन दिवसात निर्णय घेतला जाईल, असा दावा करुणा शर्मा यांनी कालच केला होता. 

Share this article

Tags:

About The Author

Post Comment

Comment List

Follow us