'... तर शरद पवार झाले असते देशाचे राष्ट्रपती'
अजूनही वेळ गेली नसल्याचे सांगत आठवले यांचे पवारांना आमंत्रण
जालना: प्रतिनिधी
राष्ट्रवादी. काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार वेळीच आमच्यासोबत आले असते तर देशाचे राष्ट्रपती झाले असते, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. अजूनही वेळ गेलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी एकत्र येऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
शरद पवार जर आमच्या आघाडी बरोबर आले असते तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासासाठी, विशेषतः शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी भरीव योगदान दिले असते. अजूनही वेळ गेलेली नाही शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा दिला तर ते देशासाठी चांगलेच होणार आहे, असे आठवले म्हणाले.
शरद पवारांनी अजित पवार हे एकत्रच होते आणि एकत्रच आहेत. अजित दादांचे एवढेच म्हणणे होते की तुम्हाला राजकारणात शिवसेना बरोबर आलेली जर चालते तर भारतीय जनता पक्ष का नाही, असे आठवले यांनी सांगितले. शरद पवार जर आमच्याबरोबर येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असेही ते म्हणाले.
... तर आम्हालाही एकत्र यावे लागेल
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकतर ठाकरे बंधू एकत्र येतील असे मला वाटत नाही. ते जर एकत्र आले तर महाविकास आघाडीत फूट पडेल आणि त्याचा फायदा आम्हालाच होईल, असा दावा करतानाच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी राज्याच्या राजकारणावर त्याचा फार फरक पडणार नाही, असे मत देखील आठवले यांनी व्यक्त केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र येणार असतील तर मी आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही एकत्र यावे लागेल, असेही ते म्हणाले.