- राज्य
- 'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा'
'दहशतवादविरोधी लढ्यात भारताकडून जगाला खूप अपेक्षा'
शिष्टमंडळाचा विदेश दौरा पार पडल्यावर सुप्रिया सुळे यांनी सांगितले अनुभव
मुंबई: प्रतिनिधी
दहशतवादाचे मोठे संकट जगासमोर असून त्याच्या विरोधातील लढ्यात जगाला भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असे 'ऑपरेशन सिंदूर' राबविण्यामागील भारताची भूमिका कथन करण्यासाठी विदेश दौऱ्यावर गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सुळे या कतार, दक्षिण आफ्रिका,इथियोपिया आणि इजिप्त या देशांना भेट देणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात सहभागी झाल्या होत्या. दौऱ्यावरून परतल्यावर त्यांनी आपले अनुभव पत्रकारांना कथन केले.
भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे भारताने चोख प्रत्युत्तर दिले ते योग्यच आहे. मात्र, त्यानंतर भारताने संयम दाखवून या संघर्षाला सर्वंकष युद्धाचे स्वरूप प्राप्त होऊ दिले नाही, हे कौतुकास्पद असल्याच्या भावना विविध देशांच्या प्रतिनिधींनी नमूद केल्याचे सुळे यांनी सांगितले. दहशतवादाचा मुकाबला करतानाही शांततेचा मार्ग कायम ठेवावा, अशी त्या देशांचीअपेक्षा असल्याचेही त्या म्हणाल्या.
आपण भेट दिलेल्या सर्व देशांमध्ये महात्मा गांधी यांच्याबद्दल नितांत आदर असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे पं जवाहरलाल नेहरू यांनी या देशांशी जोडलेले नाते, इंदिरा गांधी यांचे कणखर नेतृत्व, मनमोहन सिंग यांचे सर्वसमावेशक परराष्ट्र धोरण आणि नरेंद्र मोदी यांनी या देशांशी असलेल्या मैत्रीत केलेली वृद्धी, याबाबत या सर्व देशांनी आदर व्यक्त केला. तसेच आपण भारताच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली, असेही सुळे यांनी सांगितले.