- राज्य
- 'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
'भारत-पाक संघर्षात विजयाची संधी का दवडली?'
पंतप्रधान मोदी आणि रा स्व संघाला प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
पुणे : प्रतिनिधी
भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान भारताने पाकिस्तानला धडा शिकवायची संधी का दवडली? पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याची संधी का सोडली, याचा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
ॲड. आंबेडकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय राजकारणात नेतृत्व हे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे गल्लीतील भांडणात जो आक्रमक असतो तो जिंकतो. . गल्लीतील लढाईत जे होते ते मोठ्या लढाईत सुद्धा होते. तुम्ही पाकिस्तान विरोधात जिंकत असतांना माघार का घेतली? तुम्ही माघार घेतली म्हणजे xxगिरी केली, असा घणाघात त्यांनी केला.
राजकीय पक्षांनी भारत पाकिस्तान संघर्षावर उघडपणे बोलले पाहिजे. सरकारच्या कचखाऊ भूमिकेला प्रश्न केला पाहिजे. देशाची सुरक्षा फक्त राजकीय पक्ष आणि निवडून गेलेले लोकप्रतिनिधी एवढ्यापुरते मर्यादित नाही, तर जनतेची आहे. जनतेने यात सहभाग घ्यावा आणि यावर सरकारला प्रश्न विचारावा, असेही आंबेडकर म्हणाले.
पंतप्रधान मोदी जगभर फिरले पण भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान एकही देश उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला नाही, याची कारणे पहिल्यांदा सरकारने मांडली पाहिजेत. रशिया हा भारताचा जुना मित्र आहे. भारताकडे रशियाची अनेक संरक्षण साहित्य आहेत. मात्र, भारत - पाकिस्तान संघर्ष संपल्यावर रशियाने पाकिस्तानला मदत केली आहे.
ज्याप्रमाणे १९७१च्या युद्धा दरम्यान रशिया उघडपणे भारताच्या बाजूने उभा राहिला होता, तसा आताच्या भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान तो उभा राहिला नाही. ज्या फ्रांस देशाकडून आपण राफेलसारखी एवढी विमाने घेतली, तोही भारताच्या बाजूने उभा राहिला नाही, असे त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानकडे १० दिवस पुरेल एवढाच दारुगोळा होता. तो दारुगोळा संपला असता, तर भारताला पाकिस्तानवर पाहिजे ती अट घालता आली असती. आपल्या नेतृत्वाने कच खाल्ली आणि आपण जिंकलेली लढाई हरलो. आरएसएसवाल्यांना आम्ही विचारतोय की, तुम्ही प्रत्येकवेळी पाकिस्तान विरोधात का हारताय, असा सवालही आंबेडकर यांनी केला
अग्निवीर जवानांचा एक गंभीर प्रश्न समोर आला आहे. मुंबईतील रहिवासी असलेले मुरली नाईक या अग्निवीर जवानाला भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान वीरमरण आले. परंतु अग्निवीर जवानांना शहिद दर्जा दिला जात नाही. त्यामुळे त्यांना शासकीय सुविधा मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची परवड होत आहे. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लवकरच हा प्रश्न हाती घेऊ, असा इशाराही आंबेडकर यांनी दिला.