- राज्य
- स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक
स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला विरोध नसावा: सरसंघचालक
ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाने दाखविलेल्या एकजुटीचेही केले कौतुक
नागपूर: प्रतिनिधी
आपला कोणत्याही धर्म, पंथाला विरोध नाही. स्वेच्छेने केलेल्या धर्मांतराला आक्षेप घेण्याचे काहीही कारण नाही. मात्र, जबरदस्तीने, आमिष दाखवून अथवा फसवणूक करून केली जाणारी धर्मांतरे रोखणे आवश्यक आहे, असे महत्त्वपूर्ण विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचलक मोहन भागवत यांनी केले आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान देशाने सर्व मतभेद विसरून दाखविलेल्या एकजुकीचे सरसंघचालकांनी कौतुक केले. द्विराष्ट्रवाद आणि दहशतवादाचा धोका अजून टळला नसून देशातील एकजूट कायम राहणे गरजेचे आहे, हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता विकास वर्गाच्या समारोप समारंभात (द्वितीय वर्ष) सरसंघचालक बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद नेताम उपस्थित होते. यावेळी संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, वर्गाचे सर्वाधिकारी समीर कुमार महांती आणि नागपूर महानगर संघसंचालक राजेश लोया उपस्थित होते.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. अशी कृत्य करणाऱ्यांना कठोर शासन झाले पाहिजे, अशी सार्वत्रिक भावना देशभरात निर्माण झाली. त्यानुसार आपण त्यांना शासन केले देखील. या काळात देशाची संरक्षणसिद्धता सिद्ध झाली. शासन आणि प्रशासनाची कणखर भूमिका दिसून आली. या काळात देशात अभूतपूर्व एकतेचे दर्शन घडले. राजकीय मतभेद विसरून सर्वजण एकत्र आले. देशभक्तीच्या वातावरणात सर्व मतभेद विरून गेले. मात्र, हे वातावरण कायम राहणे आवश्यक आहे. कारण धोका अजून टळलेला नाही. या कारवाईनंतर देखील द्विराष्ट्रवाद आणि दहशतवादाचा धोका कायम आहे, याकडे सरसंघचालकांनी लक्ष वेधले.
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता आवश्यक
जगभरात युद्धाचे स्वरूप बदलत आहे. दहशतवाद आणि सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून छद्मयुद्ध. (प्रॉक्सी वॉर) लढली जात आहेत. त्या निमित्ताने कोण कोणा बरोबर आहे, कोण स्वार्थी आहे, कोण सत्याच्या बाजूने उभे राहत आहे, याची पारख होत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर असणे आवश्यक आहे. शासन, प्रशासनाने त्या दृष्टीने वेगवान पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी समाज शक्तीने देखील ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, अशी अपेक्षा भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.
विविधतेतील एकता हा भारताचा खरा धर्म
विविधतेतील एकता हा भारताचा खरा धर्म आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर विविधता आहे. प्रत्येक समाज घटकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत. अनेकदा एकाची समस्या दुसऱ्याला माहिती देखील नसते. त्यामुळे त्याबाबत निर्णय घेणे अवघड होऊन बसते. मात्र, समाजा समाजामधील संघर्ष टाळणे गरजेचे आहे. समाजात सद्भावन कायम राहणे आवश्यक आहे. अनावश्यक वाद निर्माण होता कामा नये. कोणत्याही समस्येवर कायदा हातात घेणे हा मार्ग नाही. स्वार्थासाठी समाजात फूट पाडणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नये. एकमेकांबद्दल सद्भावना, सद्विचार आणि सहकार्याची भावना असली पाहिजे, असेही भागवत म्हणाले.
आदिवासी आणि संघाने एकत्र काम करावे
धर्मांतर आणि नक्षलवाद या आदिवासी समाजासमोरील सर्वात गंभीर समस्या आहेत. याबाबत संघ आणि आदिवासी समाजाने एकत्र काम केले पाहिजे. त्यातून या समस्यांचे निराकरण होऊ शकते, असे मत प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री नेताम यांनी व्यक्त केले. नक्षलवादाच्या विरोधात केंद्र सरकारने उल्लेखनीय कार्य केले आहे. मात्र, नक्षलवादाचे समूळ उच्चाटन होणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
विकासात आदिवासींचा सहभाग निश्चित हवा
उदारीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे आदिवासींचे विस्थापन होत आहे. त्यामुळे जल, जमीन आणि जंगल धोक्यात येत आहे. विकास आवश्यकच आहे. मात्र, त्या विकासात आदिवासींना निश्चितपणे सामावून घेण्याची आवश्यकता आहे. विविध प्रकल्पांसाठी आदिवासींच्या जमिनी काढून घेण्यापेक्षा त्या लीज वर घ्याव्यात, अशी सूचना नेताम यांनी केली. धर्मांतराच्या विरोधात केंद्र आणि राज्यांनी कठोर कायदे करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.