- देश-विदेश
- 'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल'
'तपास यंत्रणांकडून न्यायालयांची दिशाभूल'
मद्य घोटाळा अस्तित्वात नसल्याचा केजरीवाल यांचा दावा
मद्यधोरण घोटाळा नावाचे प्रकरण मुळात अस्तित्वातच नाही. भारतीय जनता पक्ष त्याबद्दल आरोप करत आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा न्यायालयांची दिशाभूल करून त्याबाबत गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
नवी दिल्ली: प्रतिनिधी
मद्यधोरण घोटाळा नावाचे प्रकरण मुळात अस्तित्वातच नाही. भारतीय जनता पक्ष त्याबद्दल आरोप करत आहे आणि केंद्रीय तपास यंत्रणा न्यायालयांची दिशाभूल करून त्याबाबत गुन्हे दाखल करीत आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला.
कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने केजरीवाल यांना दिनांक 16 रोजी दुपारी अकरा वाजता आपल्या मुख्यालयात पाचारण केले आहे. आपण सीबीआय मुख्यालयात चौकशीसाठी जाणार असल्याचे केजरीवाल यांनी पत्रकारांना सांगितले. दिल्ली विधानसभेत ज्या दिवशी आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात बोललो त्याच दिवशी चौकशीच्या फेऱ्यात पुढचा क्रमांक आपला याची जाणीव झाली होती, असेही केजरीवाल म्हणाले.
मद्यधोरण घोटाळा प्रकरणी शंभर कोटी रुपयांची लाच दिली गेल्याचा ठपका सक्तवसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाने ठेवला आहे. त्यांनी तब्बल 400 हून अधिक छापे मारूनही ही रक्कम त्यांना सापडू शकली नाही. न्यायालयात खोटी शपथपत्र सादर करून तपास यंत्रणांनी दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे, असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.
या प्रकरणाच्या चौकशीच्या नावाखाली तपास यंत्रणा रोज कोणालातरी पकडून आणत आहेत. सिसोदिया आणि केजरीवाल यांची नावे घ्या म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. चंदन रेड्डी यांना कानाचे पडदे फाटेपर्यंत मारहाण करण्यात आली. अरुण पिल्ले, समीर महेंद्र अशा पाच जणांवर सातत्याने दबाव आणला जात असल्याची आपली माहिती आहे. एका जणांच्या वृद्ध पिता आणि पत्नी यांचीही अकारण चौकशी करण्यात आल्याचा आरोपही केजरीवाल यांनी केला.
या प्रकरणात सिसोदिया यांनी आपले 14 मोबाईल फोन नष्ट केल्याचा तपास यंत्रणांचा आरोप आहे. मात्र, त्यापैकी चार फोन आपल्याकडे असल्याचे एडी सांगते, तर एक फोन सीबीआयकडे आहे. एकीकडे सिसोदिया यांनी फोन नष्ट केल्याचा दावा ते करीत असतानाच मग त्यापैकी पाच फोन त्यांच्याकडे आले कुठून, असा सवाल केजरीवाल यांनी पत्रकारांशी बोलताना केला. प्रत्यक्षात ज्या 14 फोनबद्दल तपास यंत्रणा नष्ट केल्याचा दावा करीत आहे त्यापैकी बहुतेक फोन अद्यापही कोणी ना कोणी वापरत असल्याचे दिसून आले आहे. हे फोन सिसोदिया यांचे नाहीत, असा दावाही त्यांनी केला.
'... म्हणून केले जात आहे आप ला लक्ष्य'
केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्या पद्धतीने सध्या आम आदमी पक्षाला लक्ष्य केले जात आहे, तसे आतापर्यंत इतर कोणत्याही पक्षाच्या बाबतीत घडलेले नाही. मात्र, आम आदमी पक्षाबद्दल लोकांच्या मनात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. आत्मीयता निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांच्या मनातील या अपेक्षा आणि आत्मीयता चिरडून टाकण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे. त्यामुळेच केंद्रीय तपास यंत्रणा आम आदमी पक्षाच्या मागे लागल्या आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला.