- राज्य
- भरतनाट्यमपासून चित्रकलेपर्यंत, एक जिद्दीचा प्रवास
भरतनाट्यमपासून चित्रकलेपर्यंत, एक जिद्दीचा प्रवास
संकटाचे केले संधीत रूपांतर
On
पुणे: प्रतिनिधी
भरतनाट्यमसारख्या शास्त्रीय नृत्यकलेत शास्त्रोक्त पद्धतीने, दिवसाला चार-पाच तास सराव करून, आठ वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर अरंगेत्रम सारखा प्रतिष्ठेचा कार्यक्रम करणे म्हणजे आयुष्याचं मोठं स्वप्न पूर्ण होणं. प्रिया जगनगाडा हीच ही हेच स्वप्न होतं. अरंगेत्रमनंतर स्वतःची भरतनाट्यम संस्था, गुरुकुल सुरू करण्याचं!
कार्यक्रमासाठी तयारी जोरात सुरू होती. पोशाख शिवणे, दागिने हैदराबादहून मागवणे, संगीतकार केदार परांजपे व गायक ऋषिकेश रानडे यांच्यासोबत रियाज, मेकअपसाठी के. मोहन यांची निवड हे सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण नियतीने वेगळं पान उघडलं.
एके दिवशी झोपेतच तिचे गुडघे अचानक लॉक झाले. प्रचंड वेदना, पाय सरळ न होणे...आणि हे रोज व्हायला लागलं त्यामुळे डॉक्टरांकडे जावं लागलं तपासणीनंतर डॉक्टरांनी दिलेला निकाल फार भीतीदायक होता – दोन्ही गुडघ्याच्या वाट्या सरकलेल्या आहेत; नृत्य ताबडतोब बंद करा!
तो तिच्या आयुष्याचा धक्का होता. अनेकांनी विनंती केली, पण डॉक्टरांनी निर्विकारपणे नकार दिला.
परंतु प्रिया ठाम होती, अरंगेत्रम करायचंच!
मग सुरु झाला संघर्ष. केरळ उपचार पद्धतीने तेल आणून दररोज मालिश, पिठाचे कोंदण करून त्यात आयुर्वेदिक तेल ओतून गुडघ्यात जिरवणे, वेदनाशामक औषधे...आई शारदाने घरकामातुन वेळ काढून दिवसरात्र सेवा केली. परिस्थितीशी लढत, अपूर्ण उपचार असूनही, प्रियाने तीन तासांचा कार्यक्रम टिळक स्मारक येथे अविस्मरणीय यशाने पूर्ण केला. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर हा तिच्या जिद्दीचा साक्षीदार ठरला.
मात्र त्यानंतर तिच्या नृत्य करिअरचे दार बंद झाले. गुरुकुल सुरू करण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर तिने नवा मार्ग निवडला. चित्रकला!
ही कला तिच्या वाट्याला कधी आली नव्हती. भरतनाट्यम मध्ये करिअर करायचं ठरवल्यामुळे चित्रकला हा विषय डोक्यात नव्हता किंवा त्या दृष्टीने त्याकडे पाहिलं नाही. ड्रॉइंग हा विषय तिला अजिबात आवडायचा नाही. पण नियतीने दिलेल्या वळणावर तिने खंबीर निर्णय घेतला.
आज मागे वळून पाहताना वाटतं की तो निर्णय योग्य होता. चित्रकलेला देव मानून प्रियाने झोकून दिलं. कामातील सातत्य, प्रयोगशीलता, चिकाटी, संयम, सौंदर्यदृष्टी – हे सर्व तिच्या प्रत्येक चित्रातून झळकतं. भरतनाट्यमसारखी शिस्तबद्ध १५ वर्षांची अखंड साधना तिने चित्रकलेतही आणली. परिणाम म्हणून ती आज सर्वोच्च स्थानी पोहोचली आहे.
९ सप्टेंबर तारखेला मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये तिच्या पंधरा वर्षातील अविरत साधनेतून तयार झालेल्या निवडक २२ सुंदर अशा कलाकृतींचा प्रदर्शन सोहळा सुरू होणार आहे. जसा टिळक स्मारकात तिचा अरंगेत्रम झाला तसा, हा देखील तिच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरणार आहे.
About The Author
Related Posts
Latest News
08 Sep 2025 19:09:06
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
टाकवे- मावळ तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष समजून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार सुनील शेळके यांनी हाती...