डॉ. प्रल्हाद खंदारे यांचा हक्काच्या घरासाठी २० वर्ष संघर्ष
मुंबई / रमेश औताडे
जगाची ओळख असलेल्या मुंबई शहरात घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न सर्वांचेच पूर्ण होत नाही. मात्र मागील २० वर्षापासून डॉ. प्रल्हाद खंदारे यांनी घरासाठी लढा सुरू ठेवला आहे. सरकारी बाबू मात्र त्यांना कागदी घोडे व लाल फितीचा कारभार दाखवत वेळकाढू धोरण अवलंबित आहेत. मात्र खंदारे यांनीही हार मानली नाही.
वेळोवेळी संबंधित विभागाला पत्रव्यवहार करून पुढील अपडेट घेत, पत्रकार परिषदा घेत न्याय मागण्याचा लढा सुरू ठेवला आहे. सरकारने जर आम्हाला न्याय दिला नाही तर हा लढा अजून तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे.
म्हाडा आणि शासनाकडून मागील २० वर्षापासून आम्हा सदनिका मागणी धारकावर अन्याय केला आहे, असे सांगत खंदारे म्हणाले,
स्वयंभू कोकण मागसवर्गीय गृहनिर्माण सहकारी संस्था( नियोजित) या संस्थेकडून आम्ही रितसर अर्ज केला होता. म्हाडा प्राधिकरणाने काही गृहनिर्माण संस्थेला सदनिका दिल्या. मात्र आम्हाला डावलण्यात आले. हा दूजाभाव जेव्हा आमच्या लक्षात आला तेव्हा आम्ही आमचा लढा अजून तीव्र केला.
विधी व न्याय विभाग व संबंधित शासनाचे सर्व विभाग यांना रीतसर पत्रव्यवहार केला. शासन निर्णय असताना सरकारी अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. आता काही लाभधारक हयात नाहीत त्यामुळे ८४ सदनिका पैकी कमीत कमी ५० लाभधारकांना तयार सदनिका मुंबईत देण्यात याव्यात अशी मागणी खंदारे यांनी केली आहे.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले तर आम्हाला सदनिका मिळतील. काही लाभधारक आज हयात नाहीत. मात्र जे हयात आहेत त्यांच्या मरणाची वाट सरकारी अधिकारी पाहत आहेत काय ? असा सवाल त्यांनी केला आहे.
आम्ही मागासवर्गीय आहोत असे जर सरकारी बाबूंना वाटत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी डॉ. प्रल्हाद रामभाऊ खंदारे यांनी केली आहे.
000