- राज्य
- '... तर वाचला असता वैष्णवी हगवणेचा जीव'
'... तर वाचला असता वैष्णवी हगवणेचा जीव'
रोहिणी खडसे यांचा रूपाली चाकणकर यांच्यावर हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
महिला आयोगाच्या कार्यपद्धती विषयी विधान परिषदेच्या सभापती डॉ नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. अशा बैठका आधीच घेतले असत्या तर वैष्णवी हगवणे यांचा जीव वाचला असता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांनी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावरही कठोर टीका करून त्यांच्या राजीनाम्यची मागणीही खडसे यांनी केली आहे.
महिला आयोगाची कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्व आणि अडचणी याबद्दल चर्चा करण्यासाठी डॉ गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यादेखील उपस्थित राहणार आहेत.
महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा राजीनामा आपण मागत असल्यामुळेच या बैठका घेण्याचे सत्ताधाऱ्यांना सुचले आहे. मात्र, हे उशिरा सुचलेले शहाणपणा असून या बैठकांचा दिखावा बंद करा. सध्याच्या काळात महिला आयोगासह सर्व व्यक्ती केंद्रित आहेत. त्यामुळेच महिला आयोगावर इतर सात सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही, अशी टीकाही खडसे यांनी केली.
महिला आयोगाच्या विद्यमान अध्यक्ष 'मॉडर्न' आहेत. त्या केवळ मेलवर आलेल्या तक्रारींची दखल घेतात. त्यामुळे त्यांना महिलांच्या तक्रारींची 'झिरो पेंडन्सी' असल्याचे दिसते. मात्र खेड्यापाड्यातील महिला मेल वरून आपल्या तक्रारी महिला आयोगापर्यंत कशा पोहोचविणार, असा सवालही खडसे यांनी केला. प्रिया फुके यांनी पोस्टाने तक्रार केली होती. मात्र, रूपाली चाकणकर पोस्टाने आलेल्या तक्रारींची दखल घेत नाहीत. त्यामुळे प्रिया फुके हिने तक्रारच केली नसल्याचा त्यांचा दावा आहे.
रूपाली चाकणकर यांना दोन दोन जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. त्यांचा वेळ पक्षाच्या कामात जातो. त्यामुळे त्यांना सहसा महिने महिला आयोगाची बैठक घेण्यास वेळ मिळत नाही, अशी टीकाही खडसे यांनी केली.