- राज्य
- विठुरायाच्या कृपेमुळेच संकल्प सिद्धी झाल्याची डॉ गोऱ्हे यांची भावना
विठुरायाच्या कृपेमुळेच संकल्प सिद्धी झाल्याची डॉ गोऱ्हे यांची भावना
निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महापूजा
पुणे: प्रतिनिधी
पुण्याच्या नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त शिवसेना नेत्या व राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते महापूजा, अभिषेक आणि महाआरती पार पडली. या दिवशी त्यांनी पांडुरंगाच्या चरणी देश व राज्यासाठी केलेल्या मागील वर्षीच्या संकल्पाच्या सिद्धतेबद्दल विठ्ठल-रुक्मिणी मातेस कृतज्ञता व्यक्त केली.
या धार्मिक विधींमध्ये डॉ. गोऱ्हे यांच्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्त्या जेहलम ताई जोशी, मंदिराचे विश्वस्त आणि माजी नगरसेवक विशाल धनवडे, सामाजिक कार्यकर्त्या सुदर्शना त्रिगुणाईत, डॉ. गोऱ्हे यांची सून डॉ. सतलज आणि नात ईरा उपस्थित होत्या.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “मागील आषाढी एकादशीस विठोबाच्या चरणी प्रार्थना केली होती की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार यावे आणि राज्यात महायुतीचे सरकार स्थापन व्हावे. विठ्ठल-रुक्मिणीच्या कृपेने ती प्रार्थना पूर्ण झाली. त्यामुळे या वर्षी मी कृतज्ञतेने पांडुरंगाच्या चरणी महापूजा अर्पण करत आहे.”
त्याचबरोबर त्यांनी राज्याच्या विकासासाठी सुरू असलेल्या योजनांचा उल्लेख केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात जलसंधारण, स्वच्छता, जेवण, दिंडी अनुदान, वारीसाठी पायाभूत सुविधा, अशा विविध स्तरांवर काम सुरू आहे. मंदिर परिसरात होणाऱ्या गळतीवर नियंत्रण, टोकन प्रणालीमुळे दर्शनासाठी वेळेची बचत, हे महत्त्वाचे बदल होत आहेत,” असे त्या म्हणाल्या.
राज्य विधानमंडळाचे अधिवेशन सुरू असताना, शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्याचा आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी निर्णायक पावले उचलण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. महिलांसाठी ‘स्वयंसिद्धा’ मोहिम, बालक व एकल महिलांसाठी सुरक्षात्मक उपक्रम, वंचित विद्यार्थ्यांसाठी महाज्योती, सारथी, बार्टी आदी संस्थांमार्फत सुविधा देण्यावर सरकारचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौरव करताना त्यांनी म्हटले, “महाराष्ट्रातील समस्त महिलांचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब संकटग्रस्त प्रवाशांसाठी काश्मीर, हिमाचल, महाराष्ट्रात जिथे गरज असेल तिथे धावून जातात. तसेच, त्यांनी ‘लाडक्या सुनेचे हुंडा बळी’ प्रकरणात स्पष्टपणे शिवसेना महिलांच्या पाठीशी उभी राहील, हे स्पष्ट केले आहे. त्यांच्या या कार्याला गती देणार आहे.”
समारोप करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “खरा विश्वास आणि श्रद्धा देव जाणतो. टीका, निंदा, अपप्रचार याकडे दुर्लक्ष करून समाजासाठी निःस्वार्थपणे काम करत राहण्याचा संकल्प मी आज विठोबाच्या चरणी करत आहे.”
या भावपूर्ण आणि सामाजिक संदेशांनी परिपूर्ण पूजाविधीने पुणेकर विठ्ठल भक्तांच्या श्रद्धेला नवीन उर्जा दिली आहे असे डॉ. नीलम गो-हे म्हणाल्या.