- राज्य
- 'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
'हिंदी बनली मुंबईची बोलीभाषा, तीच आमची लाडकी बहीण'
मंत्री प्रताप सरनाईक यांची मुक्ताफळे
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी ही आता मुंबईची बोली भाषा बनली आहे. मराठी आमची माय असली तरीही हिंदी आमची लाडकी बहीण आहे. या लाडक्या बहिणीमुळेच आम्ही 2372जागापर्यंत पोहोचू शकलो, अशी मुक्ताफळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उधळली आहेत. विशेष म्हणजे मराठी माणसाचा कैवार घेण्यासाठी उभ्या राहिलेल्या शिवसेनेचे सरनाईक हे नेते आहेत.
मराठीला आपण मातृभाषा म्हणतो. मात्र, हिंदी ही मुंबईची बोलीभाषा झाली आहे. मी एरवी शुद्ध मराठीत लोकांशी संवाद साधतो. मात्र, मीरा-भाईंदर येथे जाताच आपोआप तोंडातून हिंदी भाषा बाहेर पडते. मीरा-भाईंदर हा माझा मतदारसंघ आहे, असे सरनाईक म्हणाले.
सरनाईक मांडत असलेले विचार भाजप आणि अमित शहांचे
सरनाईक यांच्या या वक्तव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कठोर टीका केली आहे. मराठी माणसाला सन्मानाने जगता यावे यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. हे लोक आपणच बाळासाहेबांचे वारसदार असल्याचा दावा करतात. मग सरनाईक यांनी व्यक्त केलेली भूमिका हीच त्यांच्या पक्षाची मराठी बाबतची भूमिका आहे का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान राऊत यांनी दिले. सरनाईक मांडत असलेले विचार हे भारतीय जनता पक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांचे आहेत. त्यामुळेच अमित शहा हेच शिंदे सेनेचे नेते असल्याचे आपण वारंवार सांगत आलो आहोत, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ही सरनाईक यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे. मुंबई ही मराठी माणसाची आहे हे सरनाईक यांना माहिती आहे का, असा सवाल मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी केला. यांचेच एक मंत्री यापूर्वी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी करत होते. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, अशी मागणीही किल्लेदार यांनी केली. मतांच्या लाचारीसाठी मराठी आणि मुंबई गहाण ठेवणार असाल तर ते खपवून घेतले जाणार नाही. मराठी माणसाच्या हक्कासाठी आम्ही लढतच राहू, असेही ते म्हणाले.