- राज्य
- मावळातील कुंडमळा दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू; ३८ जणांना वाचविण्यात यश
मावळातील कुंडमळा दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू; ३८ जणांना वाचविण्यात यश
मृत पावलेल्या कुटुंबियांना सरकारकडून पाच लांख रुपयाची मदत;
मावळमधील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान २५ ते ३० पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
वडगाव मावळ. : प्रतिनिधी
मावळ तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या कुंडमळा या ‘पिकनिक स्पॉट समजल्या जाणाऱ्या गावात इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत किमान २५ ते ३० पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे कळताच स्थानिक नागरिकांनी वाहून जाणाऱ्या पर्यटकांना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र सततच्या पावसाने इंद्रायणी पात्रातील पाण्याला मोठा वेग असल्याने अनेक पर्यटक वाहून गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, आठ ते दहा अॅम्बुलन्स आणि एनडीआरएफची तुकडी घटना स्थळी पोहोचली असून, सीआरपीएफ जवान, तळेगाव व वडगाव नगर परिषदेच्या अग्नीशामक दलाचे जवान आणि पोलिसांसह त्यांनी बचावकार्य तातडीने सुरू केले आहे.
सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारापर्यंत या बचाव पथकाने ३८ जणांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले असून, पाच वर्षीय मुलांसह ४ मृतदेह हाती लागले आहेत.
वडगाव मावळच्या जवळ असलेले कुंडमळा हे गाव निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी असलेल्या देवीच्या दर्शनासाठी पर्यटक येतात. त्यावेळी ३० वर्ष जुना असलेल्या या पुलावरून निसर्ग सौदर्य पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. सेल्फी पॉईंटसाठी ही जागा प्रसिद्ध आहे.
आजही या पुलावर गर्दी झाल्याने हा पूल कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा पूल जुना असल्याने तो कमकुवत झाला होता. या पुलावरून फक्त चालत जाता येते किंवा पर्यटक दुचाकी वाहने घेऊन या पुलावरून जातात. या पुलावरून मोठ्या वाहनांची वर्दळ नसल्याने पर्यटक सेल्फीसाठी येथे गर्दी करतात. आज रविवार असल्याने या भागात पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यातच सेलफी घेण्यासाठी पुलावर गर्दी झाल्याने आधीच खचलेला पूल एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांचे वजन पेलू शकला नाही आणि तो कोसळला. परिसरात दोन दिवसांपासून सलग पाऊस सुरू असल्याने इंद्रायणीचे पात्रही भरलेले आणि वाहते होते. त्यामुळे पूल कोसळताच पर्यटकांना स्वत:ला सावरायला वेळच मिळाला नाही आणि बरेच जण जोरदार प्रवाहाच्या रेट्यात वाहून गेले.
पुढे देहू आळंदीकडे जाणाऱ्या या पात्रात बऱ्याच ठिकाणी खडकाळ भाग दिसत असला तरी अनेक ठिकाणी खोल डोह आहेत असे स्थानिक नागरिक सांगतात. या खोलीमुळे यात कोणी अडकले आहे काय हे समजायला उशीर होत आहे. सुदैवाने पाऊस थांबला असल्याने बचाव पथकाला त्यांच्या कार्यात अडचणी येत नाहीत, मात्र वाहून गेलेल्या पर्यटकांची संख्या किती आणि ते किती लांब गेले असवावेत याचा अंदाज बांधणे एनडीआरएफच्या जवानांना कठीण जात आहे
लोखंडी सांगडयात अडकलेल्या वृद्धाला काढण्यात यश
पुल कोसळल्यानंतर अनेक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले तर काहीजण लोखंडी सांगाड्यात अडकून राहिले कोसळलेल्या पुलाच्या लोखंडी सांगाड्याखाल एका वृद्धाचे पाय अडकले होते आणि कमरेपासून भाग हा पाण्याबाहेर होता गेल्या तीन तासांपासून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. पण बचाव पथकाला यश मिळताना दिसत नव्हतं. अखेर एनडीआरएफच्या पथकाला कटरच्या सहाय्याने लोखंडी पुलाचे भाग कापावे लागले. त्यानंतर पथकाला वृद्धाला बाहेर काढण्यात यश आलं आहे.
- सुनील शेळके राष्ट्रवादी काँग्रेस (आमदार मावळ)
- राज्य सरकार, प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहात आहे. या पुलावरून जाण्यासाठी प्रशासनाने निर्बंध घालून दिले होते. त्या ठिकाणी जाण्यास बंदी असल्याचे फलक लावण्यात आले होते या पुलाचा वापर पाचदारी म्हणून केला जात होतो पुलावरून स्थानिक लोकांनी दुचाक्या नेल्या नसत्या तर ही घटना टळली असती असं मला वाटतं, एखाद्या ठिकाणी निर्बंध घातले असतील किंवा फलक लावले असतील तर अशी व्यवस्था तोडून जाणे चुकीचे आहे.
About The Author
