- राज्य
- 'दुचाकी चालकांचा वाद आणि गर्दीमुळे पडला पूल'
'दुचाकी चालकांचा वाद आणि गर्दीमुळे पडला पूल'
पर्यटक आणि स्थानिकांचा कुंडमळा दुर्घटनेबद्दल दावा
पुणे: प्रतिनिधी
इंद्रायणी नदीवरील पुलावर झालेली गर्दी आणि दोघा दुचाकीस्वरांमध्ये झालेला वाद यामुळे कुंडमळा येथील पुलावर ताण आल्यामुळे हा पूल कोसळला आणि दुर्घटना घडली, असा दावा स्थानिक गावकरी आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या पर्यटकांनी केला आहे.
कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील लोखंडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून पन्नासहून अधिक जण जखमी आहेत. आपत्ती निवारण दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरू आहे.
पावसाळ्याच्या दिवसात कुंडमळा येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. दुर्घटना घडली त्या दिवशी देखील पर्यटकांची घटनास्थळी मोठी गर्दी होती. इंद्रायणी नदीवरील पूल अरुंद असून त्या ठिकाणी एका वेळी दोन दुचाकी जाऊ शकत नाहीत. याच विषयावर दुचाकीस्वारांमध्ये खुद्द पुलावरच वाद सुरू होता. याशिवाय पन्नासहून अधिक पर्यटक व स्थानिक पुलावर उपस्थित होते. या गर्दीचा ताण सहन न झाल्यामुळे हा पूल कोसळल्याचा दावा स्थानिक नागरिक आणि घटनास्थळी हजर असलेल्या पर्यटकांनी केला.
इंद्रायणी नदीवरील हा लोखंडी पूल केवळ तीस वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला आहे. हा कोल्हापूर पद्धतीचा साकव पूल आहे. या पुलाची तीस वर्षात कोणतीही देखभाल अथवा डागडुजी सरकारकडून केली गेली नसल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. पुलाची वेळेवर देखभाल दुरुस्ती केली गेली असती तर ही दुर्घटना गर्दी नसती, असा स्थानिकांचा आरोप आहे.