सातारा जिल्ह्यातील दिंडीच्या सन्मानासाठी मठाधिपती विठ्ठल स्वामीं आक्रमक
मायणी : सातारा, सांगली जिल्ह्यातील पालख्यांचा शासकीय मान-सन्मान यादीत समाविष्ट व्हावा या मागणीसाठी वडगांव येथील जयराम स्वामी मठाचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज सोमवार दि. १६ पासून संत सखुबाई यांची नगरी असलेल्या कराड शहरातील तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत.
आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणार्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती. यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
वास्तविक पाहता दिंडी सोहळा चालकांना वाहन व इतर यंत्रणा उभारण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ही योजना जाहीर केली होती. मात्र त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यातील अनेक वर्षांची मोठी परंपरा असणार्या जयराम स्वामी पालखी सोहळा तसेच श्री गाडगेनाथ पालखी सोहळा, श्री शेकोबादादा दिंडी सोहळा, ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज दिंडी सोहळा, श्री सेवागिरी महाराज पालखी सोहळा या व इतर दिंडी सोहळ्यांचा मानाच्या यादीमध्ये समावेश नाही. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी विठ्ठलस्वामी महाराज सोमवार दि. १६ रोजी दुपारी ४ वाजल्यापासून कराड तहसिलदार कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करणार आहेत. तर इतर दिंडी सोहळ्याचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच वारकरी सांप्रदायातील अनेक कार्यकर्ते आंदोलनस्थळी भजन करुन टाळ-मृदुंगाचा गजर करत शासनाचे लक्ष वेेधून घेणार आहेत.
कोकणातून येणार्या दिंडी सोहळ्यांना अनुदान यादीमध्ये समावेश करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मदत व पूनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खा. उदयनराजे भोसले, भाजपा जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेशदादा शिंदे, आ. मनोजदादा घोरपडे यापैकी कोणीतरी मायबाप होणार का असा सवाल वारकर्यांमध्ये उपस्थित होत आहे.
सातारा सांगली जिल्ह्यातील दिंडी सोहळा मान सन्मानासाठी आम्ही हा लढा उभारला असून शासनालाही आम्ही पत्रव्यवहार केला आहेत विरोधी पक्षातील सातारा जिल्ह्याचे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष रंजीतसिंह देशमुख यांनीही शासन दरबारी आवाज उठवावा. आशीं ही मागणी जोर धरू लागली आहे.
चिपळूण ते पंढरपूर जाणाऱ्या पायी दिंड्या यामधून लाखो वारकरी पायी चालत असतात परंतु शासनाकडून कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही ठराविक दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर हॉस्पिटल व ॲम्बुलन्स असणे गरजेचे आहे परंतु शासनाचे याकडे पूर्ण पूर्ण दुर्लक्ष असून या मार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते हॉस्पिटल व ॲम्बुलन्स असणे गरजेचे आहे.
00000000000000000000