'शिंदे आणि अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात'
संजय राऊत यांनी वर्तवले भाकीत
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना भाजपकडून जशी वागणूक दिली जात आहे, त्यावरून पुढील काळात त्या दोघांचे गट अस्तित्वात राहतील की नाही, अशी शंका घेण्यास वाव आहे. कालांतराने हे दोन्ही पक्ष भारतीय जनता पक्षात विलीन करण्याची पाळी या दोघांवर येणार आहे, असे भाकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.
शिंदे आणि अजित पवार यांना दिल्लीला जाऊन बौद्धिक ऐकावे लागत आहे. आता त्यांना नागपूर आत देखील बौद्धिकाला उपस्थित राहावे लागणार आहे. त्यांचे पक्ष भाजपामध्ये विलीन करणे, एवढेच ते काय आता बाकी आहे, अशा शब्दात राऊत यांनी एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.
महायुतीतील घटक पक्षांमध्ये रडारड सुरू आहे. आदळआपट सुरू आहे. छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने अजित पवार यांचा गट उभा करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, त्यांना घरी बसवण्यात आले आह. ते आता, कोण दादा, कसला वादा अशी विधाने करीत आहेत. त्यांची आपसतील भांडणे इतक्या टोकाला गेली आहेत. शिंदे गटातही ज्यांना मंत्रीपद मिळाले नाही ते नाराज आहेत. काही जण तर बॅगा भरून निघून सुद्धा गेले. त्यांच्याकडे निष्ठा वगैरे काहीही नाही. मूळ शिवसेनेत अशी प्रवृत्ती चालवून घेतली जात नाही, असेही राऊत म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे. त्यानुसारच ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. प्रचाराच्या काळात एकमेकांविरुद्ध दागलेल्या तोफा आता थंड झाले आहेत. नवीन सरकार स्थापन झाले आहे. या सरकारने महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा कारभार करावा, अशा शुभेच्छा देण्यासाठीच ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीने खळबळ पाजण्यासाठी काहीही नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे 272 चे बहुमत असून देखील एक देश एक निवडणूक विधेयकाला 269 मते मिळाली. हा केंद्र सरकारचा नैतिक पराभव आहे. त्यांचेच काही स्वाभिमानी खासदार पक्षादेश झुगारण्याचे धाडस करीत आहेत. हेच धाडस आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असेही राऊत म्हणाले.